मुंबई- वेदांत कंपनीचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. वेदांतचा हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार, हे जवळपास निश्चित झालं असताना हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, असं हे सरकार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत १०७ इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून ७० हजार ते १ लाख रोजगार निर्माण होणार होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांतचा संबंधित प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी आम्ही मागील अनेक दिवसांपासून चाचपणी करत होतो. अनेक बैठका घेत होतो. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे जवळपास ९५ टक्के निश्चित झालं होतं. स्वाक्षरी झाल्यानंतर १०० टक्के प्रकल्प महाराष्ट्रात आला असता. संबंधित कंपनीने पुण्याजवळील तळेगाव येथे प्रकल्प उभारण्यासाठी जागा निश्चित केली होती. सर्वकाही सकारात्मक घडत असताना, एवढा मोठा प्रकल्प गुजरातला कसा काय गेला? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
1.54 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या प्लांटमधून महाराष्ट्रातील थेट एक लाख कुशल तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या. यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राजकारण करू नका
आदित्य म्हणाले, सदर कंपनीला आणि राज्याला शुभेच्छा. मात्र, प्रकल्प राज्याबाहेर का गेला याचे उत्तर मिळायलाच हवे. यावर राजकारण करू नका. जी कंपनी आपल्याकडे 100 टक्के येणार होती. ती का गेली हे आम्ही विचारणार. 1 लाख लोकांना रोजगार मिळणार होता. त्यामुळे याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर राजकारण म्हणा पण आम्ही प्रश्न विचारणार.
महाराष्ट्राला मोठा फटका
आदित्य पुढे म्हणाले, आपल्याकडे आता जी व्यवस्था आहे, तिच्यावर आता कोणाला विश्वास नसेल. महाविकास आघाडीचे सरकार असताना कंपनी येणार होती मग आता का नाही. आत्ताच्या सरकारने आपण काय कमी पडलो याचे उत्तर द्यावे. महाराष्ट्राला यातून मोठा फटका बसलाय. याचे दुःख होत आहे. थोडे राजकारण बाजूला ठेवून इकडेही पाहा.
या सरकारवर विश्वास नाही
आदित्य ठाकरे म्हणाले की, एवढ्या मोठ्या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष का केले? हा विषय महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा आहे. सगळे ठरले होते. त्यानंतर आत्ताचे हे खोके सरकार काय करत होते? असा प्रश्न उपस्थित होतो. कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झालाय. या सरकारवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्याचमुळे आज ही परिस्थिती उद्भवल्याची टीका त्यांनी केली.
प्रकल्प तळेगावला होणार होता-देसाई
माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले, वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली होती. गोष्टी पुढे गेल्या होत्या. त्यानंतर 3 महिन्यांपूर्वी फॉक्सकॉनचे तैवानचे सीईओंची दिल्लीत भेट घेतली होती. प्रकल्प तळेगावला होणार हे देखील निश्चित झाले होते. मात्र, त्यानंतर आता प्रकल्प आपल्या हातातून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.