मुंबई,– वीज ग्राहकांना अतिउत्तम सेवा देण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी नियमित वीजबील भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरेन्सद्वारे संवाद साधताना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वसुली वाढवावी व वीजहानी कमी करावी तसेच नादुरूस्त वीजमीटर एका महिन्यात बदलावे, असे आदेशही संजीव कुमार यांनी दिले आहेत.
महावितरणच्या विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. परंतु ग्राहकांना अतिउत्तम सेवा मिळावी म्हणून वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. वीजहानी कमी करून वसुली वाढविली तर ग्राहकांना आणखी चांगली सेवा देता येईल, यादृष्टीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन संजीव कुमार यांनी केले.
एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत ग्राहकांच्या वीजवापरात वाढ होते. या काळात अचूक बिलींग करून वसुली वाढवावी. तसेच ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन देण्यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, त्याला आणखी गती द्यावी. ग्रामपंचायत व नगरपालिका / महानगरपालिकांकडील दिवाबत्तीची तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतील थकबाकी वसुलीसाठी नियोजनबध्दपणे मोहीम राबवावी. तसेच नादुरुस्त वीजमीटर एका महिन्यात बदलावे. सध्या राज्यभर पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. यापुढे ग्राहकांना गरजेनुसार मीटर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच येथून पुढे नादुरुस्त मीटर तातडीने बदलण्यात यावेत, असे निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी बैठकीत दिले. कर्मचाऱ्यांनी वीजहानी कमी करण्यासाठी जास्तीत जास्त खबरदारी घ्यावी. वसुली वाढवावी असे सांगून शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत पैसे भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही संजीव कुमार यांनी यावेळी केले.