पुणे : महावितरणच्या सेंट मेरी उपविभाग अंतर्गत 7709 वीजग्राहकांना ऑगस्ट महिन्याचे शून्य युनिटचे वीजबिल दिल्याप्रकरणी जी नेक्स्ट सोल्यूशन या मीटर रिडींग एजंसीविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशनमध्ये महावितरणकडून फौजदारी तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, या वीजग्राहकांना ऑगस्टची वीजबिले सप्टेंबरच्या वीजबिलात दुरुस्त करून देण्यात येणार असून त्याचा कोणताही वेगळा आर्थिक भूर्दंड वीजग्राहकांवर पडणार नाही अशी ग्वाही महावितरणकडून देण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी की, रास्तापेठ विभाग अंतर्गत लुल्लानगर, नेताजीनगर, साळुंखेविहार रोड परिसरातील वीजग्राहकांच्या मीटरचे रिडींग घेण्याचे काम मेसर्स जी नेक्स्ट टेक सोल्यूशन भोसरी, पुणे या एजंसीला देण्यात आलेले आहे. परंतु ऑगस्ट 2017च्या बिलासाठी मीटर रिडींगच्या कामामध्ये या एजंसीने हेतुपुरस्सर चुका केल्याचे दिसून आले. त्यामुळे लुल्लानगर, नेताजीनगर, साळुंखेविहार रोड, समता कॉलनी, कुबेरा पार्क, सिंध हिंद कॉलनी, केदारी नगर, इथोपिया सोसायटी, गंगा सॅटॅलाईट सोसायटी, ग्रीन व्हॅली आदी परिसरातील 7709 वीजग्राहकांनी ऑगस्ट 2017 चे वीजबील शून्य युनिटचे देण्यात आले आहे. यात महावितरणचे एक कोटी 72 लाख रुपयांचा महसूल ठप्प झाला आहे व संबंधीत वीजग्राहकांना सदर चुकीच्या वीजबिलांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणने याची गंभीर दखल घेऊन मेसर्स जी नेक्स्ट टेक सोल्यूशन या मीटर रिडींग एजंसीविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
तसेच मीटर रिडींग एजंसीच्या चुकीमुळे ज्या 7709 वीजग्राहकांनी शून्य युनिट वापराचे वीजबिल देण्यात आले त्यांना माहे सप्टेंबरमध्ये योग्य वीजवापराचे वीजबिल देण्यात येणार आहे. या वीजबिलांच्या दुरुस्तीमध्ये संबंधित वीजग्राहकांवर कोणत्याही प्रकारे वेगळा आर्थिक भुर्दंड पडणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.