मोहोळ आणि बिडकर दोहोंच्या तक्रारीत एक कडी -मोबाईल.
भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी आहेत काय टार्गेट ?
यामागे दडलंय कोण ? येणार बाहेर.कि…
पुणे ः माजी महापौर भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्याच्या तक्रारीनंतर आता पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृहनेते आणि नगरसेवक गणेश बिडकर यांच्याकडे २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात सायबर गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात काल गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात असल्यामुळे कोणीतरी माझी बदनामी करण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण पोलिसांकडे तक्रार दाखल करीत असल्याचे बिडकर यांनी तक्रारअर्जात नमूद केले आहे. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झाले असताना बिडकर यांच्या व्यक्तीगत मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉटसअप कॉल आला. हिंदीमिश्रित मराठीत बोलत असलेल्या व्यक्तीने प्रारंभी शिवीगाळ केली. तुला राजकीय मस्ती आली आहे आणि २५ लाख रूपये दिले नाहीत, तर तुझे राजकीय जीवन संपवून टाकेल, अशी धमकी या व्यक्तीने दिली. आता तुला राजकीय जीवनातून संपवण्यासाठी मी तुझी बदनामी सुरू करणार आहे, अशीही धमकी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने दिली. माझी राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण तक्रार दाखल करीत असल्याचे बिडकर यांनी सांगितले. ज्या क्रमांकवरून धमकीचा फोन आला तो क्रमांक पोलिसांनी तक्रारीत नोंदवून घेतला आहे.
मोबाईल हॅक प्रकरणाने राजकीय तसेच शासकीय वर्तुळाने घेतला धसका
गेल्या आठवड्यातच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून दोघा जणांनी व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी तीन कोटी रुपये द्या, अशी मागणी खंडणी खोरांनी केली होती. या प्रकरणी राजेश व्यास यांच्या तक्रारीवरुन संदीप पाटील, शेखर ताकवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोबाईल हॅक करून आपल्या नावाने आपल्याच परिचितांना खंडणी मागितली गेल्याचे मोहोळ यांनी म्हटले होते.मोबाईल हॅक प्रकरणाने अनेकांनी धसका घेतला आहे.मोबाईल हॅक बाबत आणि संभाषणातील आवाजाच्या बाबत अद्याप काहीही अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही
महत्वाच्या २ पदाधिकाऱ्यांनंतर आता नंबर असेल कोणाचा ?
महापालिकेतील मोहोळ आणि बिडकर हे दोघे महत्वाचे पदाधिकारी होते.भाजप चे महाराष्ट्रातील नेते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे म्हणून त्यांची ख्याती आहे अशा या दोहोंच्या बाबतीत असे प्रकार घडल्याने आता पुन्हा असा प्रकार घडेल काय ? असा प्रश्न उपस्थित निश्चित होणार आहे.एकूण ४ पदाधिकारी महापालिकेत ५ वर्षाच्या सत्रात महत्वपूर्ण पदाधिकारी राहिले आहेत.सायबर क्राईम ने शहरात अशा प्रकाराने मुसंडी मारल्याने पुढील काळात अतिशय सावधानता प्रत्येक क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींना आणि सामान्य नागरिकांनाही घ्यावी लागणार आहे हे निश्चित.
कसबा विधानसभेनंतरच का ?
दरम्यान या प्रकारांचा आणि कसबा विधानसभा निवडणुकीचा काहीही संबध नसला तरीही हे दोन्ही प्रकार कसब्याच्या निवडणुकीनंतरच उघड झाले आहेत.याकडे विशेष अंगाने पाहण्याची गरज वाटत नसल्याचे म्हणणे मांडले जात असले तरी हा हलकासा कवडसा तपासला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.आरोपी पकडले जातील पण पुढचा तपास देखील समोर येणे राजकीय वर्तुळात महत्वाचे मानले जाते आहे.