पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांचे ‘भावसरगम’ स्वरमैफलीत सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाचा समारोप
पुणे : मोगरा फुलला… माझे राणी माझे मोगा… अशा एकाहून एक सरस मराठी गीतांप्रमाणेच हात नका लावू माझ्या साडीला… या अजरामर झालेल्या लावणीसह विविध गीते सादर करीत युवा कलाकारांच्या साथीने ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदी अर्थात भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. पुण्यामध्ये सादर केलेल्या कार्यक्रमात रसिकांकडून मिळणारी दाद आणि कार्यक्रमादरम्यान अनुभवलेले विविध किस्से देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली गायिका विभावरी देशपांडे, मनिषा निश्चल, मधुरा दातार, प्राची देवल, गायक अभय जोग यांना दिग्गज वादकांनी साथसंगत केली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी अनेक अनुभव सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत तुलसीदास यांची श्रीरामांवरील उत्कृष्ट रचना ‘ श्री रामचंद्र कृपालू भज मन ‘… सादर झाली. त्यानंतर ‘ मोगरा फुलला ‘ हे गीत विभावरी आपटे यांनी सादर करून वातावरण प्रसन्न केले. मधुरा दातार यांनी गायलेल्या ‘ तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ‘ ही सुरेश भटांची गझल रसिकांच्या विशेष पसंतीस पडली.
‘डौल मोराच्या मानंचा रं डौल मानंचा’ हे गीत सादर होताना हृदयनाथ मंगेशकर यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत च्या आठवणींना उजाळा दिला. गाण्याच्या रिहर्सल च्या वेळी लतादीदींनी हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून ग्रामीण ढंगाच्या शब्दांचा आणि चालीचा कसा सराव करून घेतला याची आठवण त्यांनी सांगितली. माझे राणी माझे मोगा ‘ हे लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाजलेले गोव्याच्या भाषेतील गाणे कलाकारांनी सादर झाले. त्यामध्ये झालेले वादन हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. त्याला रसिकांना भरभरून दाद दिली.
पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे आयोजित संगीत महोत्सवात ३८ वर्षे कार्यक्रम करीत आहे. रंगमंचापासून ते शेवटच्या गल्लीपर्यंत संपूर्ण वाहतूक बंद झाली होती. सगळे रसिक भारतीय बैठकीत बसले होते. रात्री १० ते सकाळी ४-५ वाजेपर्यंत कार्यक्रम सुरु होता. आजची प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती त्याकाळाची आठवण करून देत आहे, असेही त्यांनी सांगितले.