पुणे- पुण्यातील धरणे ,पाणी क्षमता, औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या याकडे लक्ष न देता महापालिकेने उंच उंच उत्तुंग इमारतींना परवानग्या दिल्या आणि जेथे ५–१० नागरिक राहत, तेथे सध्या उंच इमारती होऊन ४००-५०० नागरिक राहू लागले यामुळेच पुण्यात पाण्याची अवस्था गंभीर बनत चालली आहे, ड्रेनेजची देखील दुरवस्था होते आहे. पाणी क्षमता , रस्त्यांची रुंदी … ज्या प्रमाणात बांधकामांना परवानग्या दिल्या त्या प्रमाणात वाढलीच नाही . त्यामुळे यापुढे जलसंपदा विभागाकडून वाढीव पाणी कोटा मंजूर करवून घेतल्या शिवाय आणि पाण्याची उपलब्धता केल्या शिवाय युनिफाईड डि. सी. रूल अंतर्गत जादा एफ.एस.आय व नवीन बांधकाम परवानगी देऊ नये अशी स्पष्ट मागणी पुन्हा एकदा माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे. शहरातील वृक्षतोड , डोंगरफोड या सर्वांना येथे महापालिकेचा कारभार जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फक्त निसर्गावर खापर फोडणे योग्य होणार नाही महापालिकेचेही नियोजन त्यामगे आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र पाठविले आहे . त्यात म्हटले आहे कि,’
पुणे हे वेगाने विकसित होणारे शहर बनले असून, वाढत्या लोकसंख्येला पुरेल अशी पाण्याची उपलब्धता सद्यस्थितीत नाही. यंदा अल निनोचा दुष्परिणाम त्यामुळे होणारा उशिरा व अपुरा पाऊस त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगांव यातील कमी पाणीसाठा हा पुणेकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. पुणे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणना प्रमाणे ३० लाखाच्या आसपास होती, सध्या ही लोकसंख्या पुणे मनपाचे क्षेत्रात ८० लाखाच्या पुढे गेली असून फ्लोटिंग लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून पुणे शहरासाठी कायमस्वरूपी अतिरिक्त पाणीपुरवठा मंजूर होत नाही तोपर्यंत युनिफाईड डि.सी. रूल अंतर्गत वाढीव एफएसआय व नव्याने बांधकाम परवानगी देऊ नये ही आपणास विनंती आहे. जर युनिफाईड डि.सी. रूल नुसार वाढीव एफएसआय दिला गेल्यास अधिक उंच इमारती वाढून लोकसंख्येची घनता कमालीची वाढेल. तसेच मर्यादित क्षेत्रात लोकसंख्याही बेसुमार वाढेल. अनेक बांगल्यामध्ये जेथे ५–१० नागरिक राहतात, तेथे सध्या उंच इमारती होऊन ४००-५०० नागरिक राहत आहेत. अशा प्रकारे बेसुमार लोकसंख्या वाढून अन्य नागरी प्रश्न वाढतीलच शिवाय ‘पाणीबाणी’ निर्माण होऊन सध्याच्या मूळ पुणेकराना ‘पाणी पाणी’ असं आक्रोश करावा लागेल.
सध्याची पुण्याची परिस्थिती व पूर्वीची पार्श्वभूमी लक्षात घेता पुणेकरांचे जीवन किमान सुसह्य राहावे व पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी वेळीच खबरदारी म्हणून, जलसंपदा विभाग पुण्यासाठी कायमस्वरूपी अतिरिक्त टीमसी पाणी मंजूर करून उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत युनिफाईड डि.सी. रूल अंतर्गत अधिक एफएसआय व नव्याने बांधकाम परवानगी देऊ नये अशी विनंती मी पुनश्च आपणास करतो.

