पुणे-
पुण्यातील वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनत असून त्यासाठी विचारविनिमय करून मार्ग शोधण्यासाठी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे शनिवार दिनांक ६ जून रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत पत्रकार भवन नवीपेठ येथे ‘पुणे ट्रॅफिक परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाहतूक संबंधी विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, तज्ञ, पत्रकार व नागरिक सहभागी होणार आहेत. नागरिकांनी देखील या परिषदेत आवर्जून यावे असे या परिषदेच्या आयोजिका पुणे शहर काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की या परिषदेतील ‘शिफारसी व निष्कर्ष यांचा एकत्रित अहवाल तयार करून त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी हा अहवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांना सादर करून त्याचा पाठपुरावा केला जाईल. तसेच या ट्रॅफिक परिषदेतील सहभागी वरिष्ठ शासकीय अधिकारी व तज्ञ यांच्या चर्चेचा गोषवारा व शिफारसी यावर आधारित पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे’ असे त्यांनी सांगितले.
या परिषदेत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (वाहतूक) संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, मनपा पथविभाग प्रमुख रोहितदास गव्हाणे, पुणे मनपाचे मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे, पी.एम.आर.डी.ए. च्या चीफ इंजिनिअर श्रीमती पठाण, पी.एम.पी.एम.एल.च्या जॉइंट एम.डी. श्रीमती पोरे, पुणे मेट्रोचे प्रोजेक्ट डायरेक्टर अतुल गाडगीळ, सी.आय.आर.टी चे तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. ढोले तसेच सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, पुणे वाहतूक समस्यांचे अभ्यासक पत्रकार मंगेश कोळपकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे सर्वजण सहभागी होऊन विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करतील. असे दीप्ती चवधरी यांनी सांगितले.

१९९२ ते २००७ या काळात कॉंग्रेस पक्ष पुणे महानगरपालिकेत सत्तेत होता. पुण्याची भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि वाहतूक या संदर्भात कॉंग्रेस पक्षाने विचारपूर्वक अनेक प्रकल्प राबवले. रस्ता रुंदीकरण, सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते, मोठे फुटपाथ, बहुमजली वाहनतळ, उड्डाणपूल, भुयारीमार्ग, नदीकाठचा रस्ता, सिन्क्रोनाइज्ड सिग्नल सिस्टीम आदि पायाभूत विकासावर भर दिला. तसेच सतत १३ वर्षे पाठपुरावा करून सन २०१३ मध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी मिळवली. या प्रकारेच सातत्याने पाठपुरावा करीत पुण्याच्या वाहतूक समस्यांबाबत उपाययोजना शोधली जावी व त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी कॉंग्रेस पक्ष सदैव प्रयत्नशील राहील. त्यासाठीच या ट्रॅफिक परिषदेचे आयोजन केले आहे असे त्या म्हणाल्या.

