पालघर दि.९; जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असून शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येत आहेत. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवाना शुभेच्छा दिल्या.
आज पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे जागतिक आदिवासी दिना निमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते दूरदृष्य प्रणाली मार्फत बोलत होते.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तर, आदिवासी विकास मंत्री डाॅ विजय कुमार गावित,श्रीमती कुमुद गावित, सार्वजनिक बांधकाम (सार्वंजनिक उपक्रम वगळून)मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खा. राजेंद्र गावित, आ.शांताराम मोरे, आ.श्रीनिवास वनगा, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप कुमार व्यास, माजी आमदार रवींद्र फाटक, आदिवासी विकास आयुक्त श्रीमती नैना गुंडे, राज्यस्तरीयआढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, अपर आयुक्त आदिवासी विकास बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, डहाणू प्रकल्प अधिकारी संजीता महापात्रा, जव्हार प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब फटांगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थीत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रत्येक घटकाला मान सन्मान आणि विकासाची संधी देण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रेरणेने होत आहे. आपल्या राष्ट्रपती या आदिवासी समाजाच्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे त्या आपल्याला मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहेत.
आज क्रांती दिन ही आहे आणि ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांचा शुभारंभ झाला आहे. याचा उल्लेख करून स्वतंत्र चळवळीत आदिवासी बांधवांनी दिलेले यागदानाचे स्मरण करून मुख्यमंत्र्यांनी शहिद आदिवासींना नमन केले.
आदिवासी आश्रम शाळांचा कायापालट करण्यात आला आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी पूर्व परिक्षा केंद्र सुरू केले. 100 विद्यार्थ्यांना पीच डी साठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे. तिथे १७ संवर्गातील भरती ही स्थानिकांमधूनच करण्यात येईल.असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
देशाचा गौरव जपण्यात आदिवासींचे काम अविस्मरणीय- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आदिवासींची प्राकृतिक परंपरा जपणारी जीवनशैली आहे. देशाचा गौरव जपण्यात आदिवासींचे काम अविस्मरणीय आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
श्री फडणवीस यांनी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मुल निवासींसाठीचा हा दिवस असल्याचे सांगितले. भगवान बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचाही गौरवपूर्ण उल्लेख केला.
उपमुख्यमंत्रीश्री फडणवीस म्हणाले, देशाच्या अर्थसंकल्पात आदिवासींसाठी पाचपट आर्थिक तरतूद वाढविली आहे. आदिवासी विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या मदतीने प्रत्येक पाडा हा रस्त्याने जोडणार आहे. रस्त्या अभावी वैद्यकीय सुविधा मिळण्यात अडचण येऊ नये, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबु नये यासाठी पालघर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल भागात प्राधान्याने रस्त्याचे जाळे विकसीत केले जाणार आहे. शबरी योजनेची तरतूद 3 पटीने वाढविली आहे.प्रत्येक आदिवासी बांधवास पक्के घर मिळणार आहे.सुमारे दोन लाख आदिवासींना वनहक्काचे पट्टे वाटप करण्यात आले आहेत. शासकीय रूग्णालय, उत्तम शाळा, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.
आदिवासींच्या विकासासाठी निधी तातडीने देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
आदिवासी बांधवांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असलेला निधी तातडीने वितरीत केला जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले .
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आदिवासी बांधव हे खऱ्या अर्थाने निसर्गाचे तसे संस्कृतीचे संवर्धन करित आहेत. बहुसंख्य आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आठ तालुका असलेल्या पालघर जिल्ह्याची निर्मीती झाली.हा जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासींच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी केले.
आदिवासी पाड्याना जोडणारे रस्ते विकसित करणार- पालकमंत्री रविंद्र चव्हाण
आदिवासी पाडे हे मुख्य रस्त्यांना जोडणे आवश्यक आहे. या कामाला प्राधान्य देणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. जिल्हात ५६१ विकास कामं सुरू असून ८० अमृत सरोवर तयार होत असल्याचेही श्री चव्हाण यांनी सांगितले.
आदिवासींच्या योजना प्रभावी पणे राबविणार
- आदिवासी विकास मंत्री डाॅ विजयकुमार गावित
आदिवासींच्या पाड्यांना जोडणारे रस्ते,त्याच्यासाठी घरे, शिक्षणाच्या सुविधा, धान खरेदी, दाखले वितरण या सर्व योजना पारदर्शकपणे राबवून आदिवासींना जास्तीत जास्त लाभ देणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डाॅ विजयकुमार गावित यांनी दिली.
यावेळी खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांचीही समयोचित भाषणे झाली.
आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपणा, मानवतेबद्दल असीम श्रध्दा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रामाणिकपणा व पारंपारिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर ०९ ऑगस्ट हा “जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस महाराष्ट्रातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे.
या कार्यक्रमामध्ये विविध शासकीय योजनांचा मान्यवरांच्या हस्ते लाभ वाटप कार्यक्रम व विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या आदिवासी बांधवांचा गुण गौरव करण्यात आला. यावेळी चाळीस प्रकारचे पारिपारिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास आयुक्त श्रीमती नैना गुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जव्हार श्रीमती नेहा भोसले यांनी आभार केले.
पालघर जिल्हया प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणु व जव्हार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

