आम्हाला कोणत्याही संपत्ती, प्रॉपर्टीचा मोह नाही.
बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती
पुणे – शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाने गुणवत्तेच्या आधारावर दिला आहे.आम्हाला कोणत्याही संपत्ती, प्रॉपर्टीचा मोह नाही. ज्यांना मोह झाला त्यांनी २०१९ ला चुकीचे पाऊल उचललं. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत, त्याचा वारसा पुढे नेणार आहोत. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी विविध समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.आज विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाच्या शिवसेनेने घेतल्यानंतर शिवसेना भवन देखील घेणार असल्याच्या चर्चांना उत्तर देतांना ते म्हणाले, आम्ही कोणाच्याही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही आम्हाला त्याची गरज नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. त्याच्या कोणत्याही मालमत्तेवर आमचा दावा नाही.
आम्हाला बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे त्यामुळे आम्हाला काहीही नको, तुम्हाला कोणीही काहीही सांगितल तरी विश्वास ठेवू नका.
मी अधिकृत पणे सांगतो कोणत्याही संपत्तीवर आमचा दावा नाही. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे
शिंदे म्हणाले, ‘लोकशाहीत निवडणूक आयोग, न्यायालय स्वायत्त आहेत, त्यांना घटना, कायदा आहे. जर निर्णय आपल्या बाजूने लागला तर न्यायव्यवस्था, आयोग चांगला आहे आणि निकाल विरोधात गेल्यावर त्यावर आरोप करायचे हे योग्य नाही. हा निर्णय गुणवत्तेवर दिला आहे. लोकसभा व विधानसभेत आमच्याकडे ७३ टक्के बहुमत आहे. अनेक प्रतिज्ञापत्रही दाखल झाले.नियमानुसार निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे विधीमंडळातील हे कार्यालय ते शिवसेनेचे आहे. आम्हाला कोणत्याही संपत्ती, प्रॉपर्टीचा मोह नाही. ज्यांना मोह झाला त्यांनी २०१९ला चुकीचे पाऊल उचललं. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत, त्याचा वारसा पुढे नेणार आहोत. त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराने २०१९ ला सत्ता स्थापन केली असती तर आमच्यावर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणतीही संपत्ती नको. बाळासाहेबांचा विचार हीच आमच्यासाठी मोठी संपत्ती आहे.
एमपीएससीच्या अध्यक्षांना पत्र देऊन २०२५ नंतर नवीन पॅटर्न लागू करण्याचे सांगितले आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्यासोबत जी घटना घडली त्याचे सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत, चव्हाण यांना सुरक्षा पुरविली जाईल.कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तेली, मराठा, सोनार, ब्राह्मण, ख्रिश्चन, पंजाबी, शिंपी यासह इतर समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. कसब्यातील जुने वाडे, वाहतूक, पार्किंग, भिडे वाडा या प्रश्नांवर चर्चा झाली. या निवडणुकीत ब्राह्मण समाज नाराज नाही, तो महायुतीला मतदान करेल. हा समाज नाराज असल्याचे विरोधकांकडून पसरवले जात आहे. हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ल्या आहे. युती सरकार ज्या धडाडीने निर्णय घेत असल्याने विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. विधान परिषदेपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यात. त्यात साडेचार हजार पेक्षा जास्त थेट ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत. ट्रेंड बघायचा असेल तर ग्रामपंचायतीचा बघा, कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही जिंकू, असे शिंदे यांनी सांगितले.