गेल्या ५ जुलाई ला राजपत्र काढून निवडणूक आयोगाने सप्टेंबर २३ आणि ऑक्टोंबर २३ मध्ये महापालीकेच्या निवडणुका होत असल्याचे म्हटलेले असताना ७ जुलैला मात्र हि निवडणुकीची घोषणा नाही असे स्पष्ट करनारे पत्रक आयोगाने काढले आहे याप्रकारामुळे निवडणूक आयोगात नेमके चाललेय काय ? आयोग गोंधळला आहे काय ? असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत .
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
मुंबई, दि. ७ (रानिआ): राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने “जैसे थे थे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केले.
श्री. मदान यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यात येत नाहीत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या जशाच्या तशा घेवून केवळ प्रभागनिहाय विभाजित केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सर्वच सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख (कट ऑफ डेट) निश्चित केली जाते. त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी १ जुलै २०२३ ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना ५ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या अद्ययावत मतदार याद्या वापरण्यासाठीच वेळोवेळी कट ऑफ डेट निश्चित केली जाते आणि त्यासंदर्भातील अधिसूचनाही प्रसिद्ध केली जाते. यापूर्वीदेखील या स्वरूपाच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या अधिसूचना म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम नसतो. अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका न झाल्यास, पुन्हा नव्याने कट ऑफ डेट निश्चित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, असेही श्री. मदान यांनी सांगितले.
पण प्रत्यक्षात काढलेल्या आदेशानेमात्र सप्टेंबर मध्ये निवडणुका होत असल्याचे संकेत दिले आहेत .त्यात काय म्हटले आहे ते पहा……..आयोगाच्याच शब्दात ..
आदेश
क्रमांक रानिआ/ग्रापनि २०२२/ प्र.क्र. १२ / का-८ – मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (१८८८ चा मुंबई ३) च्या कलम १९(१)(ब), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई अधिनियम क्र. ५९) मधील कलम ७- अ, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) च्या कलम ११, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५) च्या कलम १३ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, दिनांक १ जुलै २०२३ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या माहे सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक / पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे.
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांचे आदेशानुसार,
के. उप सचिव,
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र