पेट्रोलच्या किंमती १०० रुपये लिटरच्या पुढे गेल्या आहेत. देशातल्या मुख्य शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०४ ते १०७ रुपये प्रति लिटर आहे. अशात नितीन गडकरी यांनी देशात पेट्रोलची किंमत १५ रुपये प्रति लिटर होऊ शकते असा दावा केला आहे. राजस्थानमधल्ये कार्यक्रमात जनतेला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे जे चांगलंच चर्चेत आहे.
नितीन गडकरींनी राजस्थानातील प्रतापगढ या ठिकाणी ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामाचं उद्घाटन केलं. याच कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधित केलं. भारतात इंधनाची आयात १६ लाख कोटी रुपयांची आहे. ही आयात कमी केल्यास हा पैसा परदेशात जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाईल. उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते आणि भारतात लाखो ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे आहे. त्यामुळे असं झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.
“६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरली गेली तर पेट्रोलची किंमत १५ रुपये लिटरपर्यंत कमी होऊ शकते. त्यामुळे देशातील इंधनाची आयातही कमी होईल आणि पैसा सरकारकडे जाईल. हा निधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरता येऊ शकतो. शेतकरी हा आपल्या देशाचा फक्त अन्नदाताच नाही तर उर्जादाताही होईल. ऑगस्ट महिन्यात टोयोटा कंपनीची वाहनं लाँच करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर ही वाहनं चालतील. ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज, त्याची सरासरी पकडली तर पेट्रोलची किंमत १५ रुपये प्रति लिटर होईल.”

