तेजपाल शहा लिखित श्री शिवरायांचे व्यवस्थापन शास्त्र या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास म्हणजे केवळ युद्धांचा इतिहास नव्हे तर स्वराज्य घडवताना त्यांनी सामाजिक, आर्थिक राजकीय ऐतिहासिक अशा विविध अंगाने जी क्रांती घडवली याचा संपूर्ण अभ्यास म्हणजे शिवचरित्र होय. व्यवस्थापन शास्त्राला दूरदृष्टीची जोड देऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आजही समाजाला मार्गदर्शक आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
तेजपाल शहा लिखित ‘श्री शिवरायांचे व्यवस्थापन शास्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन लेखक इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांच्या हस्ते सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात झाले. यावेळी आचार्य शाहीर हेमंत मावळे, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव प्रसादे आदी उपस्थित होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य आजच्या तरुणांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडू शकते. तेजपाल शहा यांनी यापुढे सखोल अभ्यास करून व्यवस्थापन शास्त्रामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन शास्त्र समजावून सांगण्यासाठी लेखन करावे.
महेश तेंडुलकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या गुणांचा उत्सव साजरा करणे, आज समाजासाठी अधिक गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचे अनुकरण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये प्रत्येकाने केले पाहिजे. देव देश आणि धर्म याची सांगड घालून स्वराज्य निर्मिती करणाऱ्या या युगपुरुषाला मानवंदना देणे म्हणजे त्यांचे गुण आत्मसात करणे.
तेजपाल शहा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे दक्षिण दिग्विजय मोहीम ही त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे आदर्श उदाहरण आहे. महाराजांच्या प्रत्येक व्यवहारांमध्ये व्यवस्थापन शास्त्र दिसून येते. संघटन, ध्येय, नेतृत्व, अभ्यास आणि दूरदृष्टीपणा यामुळे शिवाजी महाराज स्वराज्य निर्मिती करू शकले. १४ वर्षात ३५० किल्ले जिंकणे हे सुद्धा शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचे यश आहे. महाराजांनी ज्याप्रमाणे व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करून शून्यातून स्वराज्य निर्माण केले, त्याचप्रमाणे आपणही ते गुण आत्मसात करून आपले आयुष्य आणि देश अधिक समृद्ध करू शकतो यासाठी मी हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
शाहीर हेमंत मावळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध गुण पोवाडाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य हा त्यांचा आणखी एक गुण यापुढे आम्ही पोवाड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. या व्यवस्थापन कौशल्याचा विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी निश्चितच उपयोग होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. प्रा. संगीता मावळे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाचे सुरुवातीला शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या बाल सेवाव्रतींनी महाराष्ट्र गीताचे सादरीकरण केले