भाजपचे दरवाजे नेहमीच खुली असतात
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा म्हणजे युतीत पुन्हा समाविष्ट होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मौर्य यांचे सध्या महाराष्ट्रात मोदी @9 महाजनसंपर्क अभियान सुरू आहे. त्यात त्यांनी ठाकरेंपुढे हा प्रस्ताव ठेवला आहे.
“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही विचार असतील, तर त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी. भाजपचे दरवाजे केव्हाच बंद नसतात. आमच्या पक्षाची कवाडे नेहमीच खुली असतात. पण त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांना पुढाकार घ्यावा लागेल. भाजप प्रस्ताव ठेवणार नाही, कारण या प्रकरणी भाजपने नाही तर त्यांनी चूक केली आहे,” असे केशवप्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे.
मौर्य यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. “ज्यांचे 4 खासदार आहेत ते पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहात आहेत. जे 50 खासदार निवडून आणू शकत नाहीत ते मोदींना रोखण्यासाठी एकत्र येत आहेत,” असे ते म्हणाले.वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून सत्ताधारी शिवसेना व भाजपत राजकीय कलगीतुरा रंगला असताना भाजपच्या या बड्याने नेत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या ऑफरमुळे भाजपच्या मनात चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

