नवी दिल्ली:राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निर्णयाबद्दल माहिती देताना सांगितले की, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी लोकांची मागणी होती. लोकाग्रहास्तव खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्य़क्षपदी नियुक्ती करण्यात आली. सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्रासह, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये पक्षाची ताकद वाढावी म्हणून हा बदल करण्यात आल्याचे पवार म्हणाले. लोकांना परिवर्तन हवं आहे, असेही ते म्हणाले. शरद पवार यांनीयांनी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली .पक्षात एकाच वेळी दोन कार्याध्यक्ष का नेमले गेले, असा सवाल शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना पवार म्हणाले की, ‘देशाचा मोठा विस्तार लक्षात घेऊन दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले गेले आहेत. तसेच ही निवड करताना कुठला निकष लावला गेला असाही प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, अनेक लोकांची तशी मागणी होती म्हणूनच दोन कार्याध्यक्ष निवडले. अजित पवार नाराज नाहीत, असे स्पष्ट करत त्यांच्यावर राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले आहे.