कोल्हापुर-दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात सात तरुणांनी औरंगजेब व टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवले होते. त्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी शहर बंदची हाक दिली होती. सकाळी मोठ्या संख्येने आंदोलक शिवाजी चौकात जमले. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही. मात्र आंदोलक ठाम होते. त्यामुळे पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली. याच वेळी काही तरुणांनी बिंदू चौक, अकबर मोहल्ला आदी भागात दगडफेक केली. त्यात ५० वाहने, काही दुकानांची तोडफोड झाली. एक ते सव्वा कोटींचे नुकसान झाले. १५ पोलिसांसह काही नागरिकही जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आधी लाठीचार्ज व नंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
शिंदे-फडणवीस सरकार कायदा- सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? दंगली घडवून पोळी भाजण्याचा भाजपचा डाव आहे.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
अहमदनगरमध्ये औरंगजेबाचा फोटो दाखवला त्यामुळे पुण्यात आंदोलनाची गरज काय? कुणीतरी मेसेज पाठवला म्हणून कोल्हापूरला रस्त्यावर उतरून धार्मिक रूप देण योग्य नाही. राज्यकर्ते यामध्ये उतरत आहेत, यातून कटुता वाढतेय. हे चांगले लक्षण नाही. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
महाराष्ट्रात दंगली होणार हे विरोधक सातत्याने सांगत होते. त्याला विशिष्ट समुदायाचा प्रतिसाद मिळून अनेक जिल्ह्यात औरंगजेब, टिपू सुलतानचे उदात्तीकरण होत आहे. औरंग्याच्या इतक्या औलादी अचानक कशा पैदा झाल्या याचा आम्ही शोध घेऊ. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री