लोकसभा पोटनिवडणूक :उमेदवारी देतानाच लागणार ज्या त्या पक्षाची कसोटी...
पुणे- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारली. त्याचा फटका भाजपला बसला.सातत्याने राखला जाणारा मतदारसंघ हातातून निसटला.असा प्रचार हा भ्रमाचा भोपळा आहे.टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती तर भाजपाला विजय प्राप्त झाला असता हाही भ्रमच आहे,भाजपचा कसब्यात पराभव निश्चित होताच.ज्याला महापालिकेच्या ५ वर्षाची कारकीर्द कारणीभूत होती आणि राज्य आणि केंद्रातील घडामोडी देखील त्यामागे होत्याच.राज्यातल्या नेतृत्वाने बापटांच्या नेतृत्वाला कायम शह देण्याचा प्रयत्न केला.कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा यांना पुणेकरांच्या मागणीवरून पुण्यात आणले नाही तर पुण्यातल्या भाजपच्या बापटांच्या सारख्या प्रस्थ बनत चाललेल्या नेत्यांचे खच्चीकरण हे हि चंद्रकांत दादांना पुण्यात आणण्या मागचे कारण होते. राज्यातल्या नेतृत्वाने मुळात पुण्यातल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांवर दाखविलेला हा अविश्वासच होता.ज्यांच्यावर पुण्याची धुरा सोपविली अशांतील महापालिका पदाधिकारी यांनी बापटांच्या नेतृत्वाला कायम खेचण्याचे प्रयत्न केले त्याचाच परिणाम बापटांना स्वतः महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात घुसून तेथील पाण्याचे प्रेशर तपासण्याचे आंदोलन करावे लागले होते.त्यामुळे कसब्यात पराभव तर होणार होताच ‘देवदूत’ नावाच्या अग्निशामक दलासाठीच्या गाड्यांच्या खरेदीचा भ्रष्टाचार,कात्रज कोंढवा रस्त्याच्या निविदेतील कोट्यावधींची अफरातफर आणि २४ तास पाणी पुरवठा योजनेतील निविदा किती कोट्यवधींची लुट होत्या त्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने वेळोवेळी स्पष्ट करून पुणेकरांच्या समोर मांडण्यात यश मिळविले होते. ५ वर्षात कॉंग्रेसने घरगुती गैस,इंधन दरवाढीवर जेवढी आंदोलने केली जेवढा आवाज उठविला तेवढा कोणीच उठविला नाही.हे जनता जाणून होतीच.कॉंग्रेस,राष्ट्रवादीने मतांची विभागणी होणार नाही यासाठी दक्षता घेतली त्यामुळे कसब्यात तर भाजपचा पराभव निश्चित होताच.
पण जर टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती तर विजय झाला असता असा प्रचार केला जातो आहे.आणि त्यापासून भाजपच्या राज्य नेतृत्वाने धडा घेतल्याने पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरामध्येच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.बापट यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पाेटनिवडणुकीची हालचाल सुरू झाली आहे. कर्नाटक येथील निवडणुकीत वापरलेल्या ४२०० ईव्हीएम मशीन पुण्यात दाखल झाल्या आहेत. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्राची जागानिश्चिती कामे प्रशासनाकडून सुरू आहेत. नियमानुसार सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ पद रिक्त ठेवता येत नसल्याने पाेटनिवडणूक हाेईल अशी शक्यता वर्तवली आहे.आता खरी कसोटी भाजपची लोकसभेला उमेदवारी देण्यावरच लागणार आहे.त्यात भ्रमाच्या भोपळ्याना स्थान मिळाले तर लोकसभा भाजपच्या हातून जाणार हे निश्चितच आहे.जातीय राजकारणापलीकडे आता पुणे आणि येथील कार्यकर्ते जाऊन पोहचले आहेत. सर्वांना जनहित चांगले समजते आहे.
खासदार होण्यासाठी बॅनर लाऊन आणि जाहिराती करून कोणी खासदार होत नाही पण असे प्रयत्न भाजपमध्ये नऊ-दहा महिने सुरु आहेत.पण यात भाजपला विजयाकडे कोण नेऊ शकेल हाच प्रश्न सर्वांना भेडसावणारा आहे.बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट,माजी आमदार मेधा कुलकर्णी,माजी महापाैर मुरलीधर माेहाेळ यांच्यात उमेदवारीसाठी चुरस असल्याचे चित्र रंगविले जात आहे. संपूर्ण शहर,उपनगरे आणि त्याबाहेरही आपले प्राबल्य आणि निवडणुकीचे तंत्र,रणनीती ची ज्यांना चांगली अवगत आहे ते माजी राज्यसभा सदस्य संजय काकडे हे देखील इच्छुक आहेत.एकूणच उमेदवार देतानाच भाजपची कसोटी आणि जय पराजय निश्चित होईल असे चित्र आहे.
कॉंग्रेसमधील गटबाजी कॉंग्रेसचा मुळ शत्रू..
पुणे हा काँग्रेसचा परांपरागत मतदारसंघ आहे.अण्णा जोशी,प्रदीप रावत,आणि गिरीश बापट हे भाजपचे येथे खासदार होतेच पण त्या त्या वेळी कॉंग्रेस विषयी देशपातळीवर असलेली नाराजी त्यांच्या विजयात महत्वाचे कारण होती.आता परिस्थिती उलटी आहे. काँग्रेसमधून माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार माेहन जाेशी,अरविंद शिंदे , राेहित टिळक यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.धंगेकर यांचे नाव विनाकारण यात काही मंडळी चालवीत असल्याचीही चर्चा आहे.पण तरीही कॉंग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने लढाई ला उतरणारा उमेदवारच नाही असा सामिक्षकांचा दावा आहे. आणि त्यात आता कॉंग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी सुरु आहे.ज्यामुळे पुण्यातील कॉंग्रेसचे भवितव्य तोंडापर्यंत आलेला घास हिरावून घेतला जाईल कि काय अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी चे माजी उपमहापाैर दीपक मानकर यांच्या नावाकडे मात्र लोकसभेसाठी तगडे उमेदवार म्हणून पाहिले जाते,पण त्यांची धुरा सारी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निर्णयावर आहे.शिवाय कॉंग्रेसचा हा मतदार संघ आहे हि त्यांची अडचण आहे. खुद्द कॉंग्रेस मधून कार्यकर्ते त्यांना ‘भाऊ तुम्ही कॉंग्रेसमध्ये येऊन लढा’ असे सांगत आहेत.आणि म्हणूनच त्यांची सर्व मदार राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस चे नेते यांच्या एकत्रित जिंकण्यासाठी येणाऱ्या वैचारिक शक्तीवर अवलंबून आहे. शिवाय राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी महापाैर प्रशांत जगताप यांनी येथून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.