‘छंदश्री’ आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेचा पुरस्कार वितरण
पुणे : ‘‘साहित्याच्या क्षेत्रात लेखक, कवींना म्हणावे तसे व्यासपीठ उपलब्ध नाहीत. अशात त्यांना दिवाळी अंक हा एक पर्याय असतो. अभिनेत्यांच्या आयुष्यात काय घडत आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मात्र, कलावंत आणि लेखकांचे दिवस कसे आहेत, याकडे कोणाचेच लक्ष नाही. ही दुर्दैवाची बाब आहे, ’’ असे मत इतिहासकार विश्र्वास पाटील यांनी व्यक्त केले.
स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘छंदश्री’ आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा पुरस्कार २०२२ वितरण न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात शुक्रवारी पार पडले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, माजी प्रशासकीय अधिकारी शिवाजी चमकिरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, दिनमार्क पब्लिकेशनचे दिनकर शिलेदार उपस्थित होते.
‘मौज’ आणि दीपोत्सव’ हे सर्वोत्कृष्ट व उत्कृष्ट दिवाळी अंकाचे मानकरी ठरले. तर ‘ शोध दुर्ग गडकिल्ल्यांचा’ हा उत्कृष्ट दिवाळी अंक ठरला. यावेळी लघु कथा, व्यंग्यचित्र, अनुवाद, मुखपृष्ठ अशा विविध श्रेणीतील पुरस्कार देण्यात आले.
विश्वास पाटील म्हणाले, ‘‘मराठी दिवाळी अंकास मोठी परंपरा आहे. साहित्य, चित्रपट, नाटक असो त्यात मानवी जीवनाची कहाणी असते. त्यामुळे लोकांना काय सांगावे त्यापेक्षा काय सांगू नये हे ज्याला कळतं तो उत्तम लेखक होतो. मला इतिहासकार व्हायचे नव्हते, परंतु एक इतिहास जागरूक नागरिक म्हणून स्वतःला घडवायचे होते. पण, इतिहासाच्या या अभ्यासातून पानिपत शौर्याचा इतिहास समोर आणू शकलो.’’
‘‘दिवाळी अंकामुळे साहित्य निर्मितीला मोठी चालना मिळाली आहे. अलीकडे संख्यात्मक दिवाळी अंक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. परंतु, गुणात्मक दिवाळी अंक काढण्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्याची गरज आहे. मांडणीची चौकट तोडून नव्या विषयांना हात घालणे, लेखन करणे आवश्यक आहे. मुखपृष्ठ हे दिवाळी अंकाचे प्रवेशद्वार आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून आपली मते समाजासमोर मांडत राहायला हवे.”
परिक्षणाचे काम पाहणारे सासणे म्हणाले, ‘‘व्यंगचित्रे हे प्रभावी माध्यम आहे. याबाबत राजकीय धोरण निराशाजनक आहे. स्पर्धेसाठी २०० पेक्षा अधिक दिवाळी अंक येणे ही चांगली बाब आहे. यात लघु कादंबरीचा अभाव आढळला. संमेलनाची अभिनव कल्पना चांगली आहे. त्यातून दिवाळी अंक, पुरस्कार आदींना व्यासपीठ मिळाले.”
शिवाजी चमकिरे यांनीही मार्गदर्शन केले. दिनकर शिलेदार यांनी प्रास्ताविक केले. नयन जयप्रकाश यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राहुल शिलेदार यांनी आभार मानले.