पुणे : पाणी वाचवण्याची उपाययोजना व उपलब्ध पाणी साठ्याचा सुयोग्य वापर करून पुणेकरांनाआता दिवसातून दोन वेळेला पाणी मिळणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे कालवा समितीच्या बैठक झाली. या बैठकीत ही महत्वपूर्ण घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहूल कुल, शरद रणपिसे, सुरेश गोऱ्हे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रवीण मुंढे, अतुल कपोले आदी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
बापट म्हणाले की , शहराला पाणीपुरवठा करणार्या चारही धरणांत सध्या सुमारे २१ टीएमसी पाणीसाठा आहे. दुष्काळाचे संकट दूर होऊन यंदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांत जवळजवळ १00 टक्के पाणीसाठा झाला होता.तरी देखील शहराची, औद्योगिक वसाहती व शेतीची पाण्याची गरज विचारात घेता उपलब्ध पाणी अपुरे पडणार आहे. त्यामुळे काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करून पुणे शहराची सध्याची सर्वाधिक १३५0 एमएलडी पाण्याची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मूळ प्रकल्प अहवालानुसार, शहराला ५ टीएमसी पाणी देणे नियोजित होते, दरम्यानच्या काळात पुण्याला ११. ६० टीएमसी इतका पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला होता. पुणेकरांच्या वाढत्या गरजेचा विचार करून पाण्याचे समान वाटप आणि पुर्नवापर करण्यासाठी या पुरवठ्यात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, रब्बी व उन्हाळी हंगाम नियोजनानुसार, जुना मुठा उजवा कालवाद्वारे २. ३४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. हे पाणी वितरिका क्र. १ ते २२ यवत उपविभाग येथे वापरण्याचे नियोजन आहे. नवीन मुठा कालव्याद्वारे सिंचनासाठी एकूण ११. ५६ टीएमसी पाण्याचा साठा उपलब्ध केला जाईल. यापैकी रब्बी आवर्तन क्र १ व २ साठी प्रत्येकी ३.६० टीएमसी इतका पुरवठा होईल. उन्हाळा हंगाम आवर्तन क्र. १ व उन्हाळ हंगाम आवर्तन क्र. २(ग्रामीण भागात पिण्यासाठी व पालाखीसाठी राखीव ) ०.७६ टीएमसी साठा उपलब्ध केला जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रब्बी व उन्हाळी आवर्तन क्र. १ यामध्ये काटकसर करून ०.४० टीएमसी पाणी, कालवा गळती व दुरुस्तीतून ०.२ टीएमसी पाणी तर मुंढवा येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातून शुद्ध केलेले पाण्याचा पुर्नवापर करून १.२० टीएमसी तसेच खडकवासला व पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचे अपुरे काम पूर्ण करून उर्वरित पाणीसाठा उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचेही बापट यांनी सांगितले. सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा देणारा निर्णय या बैठकीतून घेण्यात आला.