पुणे : “जो समाजाला संपूर्णरित्या समजून घेतो तोच खरा नेता असतो. त्यामूळे समाजात काम करताना संवेदना जपणे गरजेचे असते. आपण शरिराच्या अवयवांसाठी आभूषणे वापरतो मात्र मनाच्या आभुषणाचे काय! त्यासाठीचे सगळ्यात महत्वाचे आभूषण म्हणजे संवेदना आहेत.” असे उद्गार गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी काढले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या एमपीजी प्रोग्रामच्या 12 व्या तुकडीचा पदवीदान समारंभ सोहळा एमआयटीच्या विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी राज्यसभेचे खासदार डॉ. नरेंद्र जाधव, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या श्रीमती विद्या चव्हाण, महाराष्ट्र काँग्रसचे प्रवक्ते श्री. राजू वाघमारे, माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त श्री. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्युपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एसओजीच्या सहयोगी संचालिका प्रा. डॉ. शैलश्री हरिदास, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी डब्लूपीयू चे कुलसचिव (ग्रुप कॅप्टन) डी.पी. आपटे हे उपस्थित होते.
मृदुला सिन्हा म्हणाल्या, “ राजकारणात येणार्या प्रत्येक युवकाला एक नवा समाज अभिप्रेत असतो. मात्र वरिष्ठांकडून जो समाज त्यांच्या समोर ठेवला जातो त्याचे अनुकरण सावधपणे करावे. या क्षेत्रात काम करताना अनेक अडथळे समोर येतात. त्यांचा अत्यंत खंबीरपणे सामना करावा लागतो. सोबतच या क्षेत्रात काम करावयाचे असेल तर पाय जमिनीवर, डोळे आकाशाकडे आणि मनात केवळ समाजाचा विचार ठेवूनच काम करणे अपेक्षित असते. एमआयटीएसओजी सारख्या संस्थेमधून पैसा कमविणारे लोक नाही तर चांगला नागरिक व मनुष्य बाहेर पडतील असा विश्वास आहे. ”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ आज संपूर्ण जग भारताकडे अत्यंत आशेने पाहत आहे. कारण भारतीय संस्कृत्तीमध्येच शारिरीक तंदुरुस्ती, मानसिक दक्षता आणि भावनिक पातळीवर भक्कम राहण्याचे गुण आहेत. याच गुणांच्या आधारे आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. ”
डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “ कोणत्याही क्षेत्रात काम करतांना आपले ध्येय उच्च स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी आपली सकारात्मक मनोवृत्ती अत्यंत आवश्यक असते. सोबतच यशासाठी कोणताही शॉर्ट कट नसतो, त्यामूळे वेळेचे योग्य नियोजन करून आपल्या यशाचा आलेख चढता ठेवावा. ”
श्री. राजू वाघमारे म्हणाले, “ आजही आपल्या देशात राजकारण म्हणजे पैसा, सत्ता आणि बळाचा वापर असे समीकरण आहे. पण जर तुमचे विचार प्रबळ असतील तर राजकारणासारख्या क्षेत्रातही तुम्ही अत्यंत वेगाने पुढे जाल. एमआयटीएसओजी सारखी संस्था म्हणजे नवयुवकांना या क्षेेत्रात येण्याचा राजमार्ग आहे. येथून बाहेर पडणारे विद्यार्थी हे उत्कृष्टच असतील आणि अशा लोकांनीच जगावर राज्य केले आहे. ”
विद्या चव्हाण म्हणाल्या, “ आज राजकारण ज्या पातळीवर घसरले आहे ते सुधारण्यासाठी नवयुवकांनी राजकारणात सक्रीय होणे गरजेचे आहे. त्यासाठी एसओजी ही संस्था अत्यंत उपयुक्त आहे. पूर्वीच्या काळात महात्मा गांधीपासून अनेक लोकांनी राजकारणात प्रवेश केला मात्र त्यांच्यासमोर एक ध्येय होते. तसेच ध्येय स्वत: समोर ठेवून विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे. ”
प्रा. राहुल वि. कराड म्हणाले, “ भारताच्या राजकारणास आणखीन मोठ्या पातळीवर सक्रीय करण्यासाठी गेल्या 12 वर्षांपासून हा कोर्स सुरु केला आहे. आज देशाला अत्यंत चांगले, संवेदनशील आणि भावनाशील नेत्यांची गरज आहे. हाच विचार या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटला पायाभूत ठरला. गेल्या 12 वर्षांपसून त्याच स्वरुपाचे संस्कारी वातावरण या ठिकाणी तयार झाले आहे. ”
यावेळी मान्यवरांच्या हस्ते 12व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ संपन्न झाला. या बॅचमध्ये उत्तम कमगिरी करीत सुवर्ण पदक मिळविणार्या श्रीनिवास शेरे, लाविश जैन, गौरव क़ळमकर व चंद्र हर्ष यांचा विशेष सत्कार केला गेला. यावेळी दिक्षा महाले व नझीम शेख या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा. डॉ. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. सूत्रसंचालन महेश केळकर यांनी केले. (ग्रुप कॅप्टन) डी.पी. आपटे यांनी आभार मानले.

