पुणे-“ भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राष्ट्रनायक बनवायचा असेल तर या देशाला समर्थ स्वामी रामदास यांचे साहित्याचे वाचन करणे गरजेचे आहे. तसेच, भारत हा विश्वगुरू आहे फक्त आम्हाला त्याचे सामर्थ्य प्रकट करण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील प्रत्येकाला सशक्त बनने गरजेचे आहे.” असे विचार स्वामी गोविंददेव गिरी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. नारायण गुणे लिखित ‘विश्वगुरू भारत’ व प्राचार्य प्रभाकर नानकर लिखित ‘मनुष्यबळ व्यवस्थापन व दासबोध’ या ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवहर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू. डॉ. एस. परशूरामन, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, लेखक प्रा. नारायण गुणे, लेखक प्राचार्य प्रभाकर नानकर, डॉ. रामभाऊ रईच, अरूण आंबेकर, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ व प्रा.मिलिंद पात्रे उपस्थित होते.
स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले,“भारताला विश्व गुरू बनण्याची गरज नाही कारण प्राचीन काळापासूनच तो आहेच. या देशात भारतीय संस्कृती, परंपरा ही सशक्त असल्याने या देशात कोणताही विचार बाहेरून आलेला नाही. आमच्या येथे वेदांपासून ज्ञान चालत आलेले आहे. फक्त आम्हाला ते व्यक्त करता आलेले नाही. त्यामुळे या देशाला जागविण्यासाठी समर्थ रामदास स्वामींना समजणे गरजेचे आहे.”
“आमच्या देशाची ऋषी परंपरा, आचार्य परंपरा संपूर्ण जगाला आव्हान करीत आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीची आंतरिक चेतना जागविण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. शिकागो येथील त्यांच्या भाषणानंतर भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलेला आहे. २१व्या शतकात भारत विश्वगुरू होणार या संकल्पाचा शुभारंभ आज एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत होत आहे. ही विश्वगुरू होण्याची ही सुरूवात आहे.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारतीय संस्कृती ही वैष्णव परंपरा असून राम हे भारतीय संस्कृतीचे स्वरूप आहे. ७३० वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी ज्ञान, विज्ञानाचा संदेश संपूर्ण मानवजातीला दिला होता. त्याचेच उच्चारण स्वामी विवेकानंदांनी वैदिक शिक्षण प्रणालीच्या माध्यामातून समाजाला दिला आहे. २१व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन व विश्वगुरू म्हणून उदयास म्हणून येईल.”
प्रभाकर नानकर म्हणाले,“ दासबोध हे भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक आहे. १७ व्या शतकात खचलेल्या भारतीय समाजाला बळ देण्यासाठी समर्थांनी दासबोधाच्या माध्यमातून प्रबोधन केले. त्यांनी मनुष्य घडविण्याचे कार्य केले. त्यांच्याच वापर आज संपूर्ण जागतीक व्यवस्थापन शास्त्रात वापरल्या जाते. प्रत्येकाचा, घराघरातला, कुटुंबातील, समाजातील व देशाच्या व्यवस्थापनेचा खजिना यात आहे.”
प्रा.नारायण गुणे म्हणाले,“ या पुस्तकाची संकल्पना एक दिवस एक पान एक विचार अशी आहे.भारताचे दूरदर्शी ध्येय काय आहे. विश्वगुरू म्हणून भारत कसा उदयास येई शकतो आणि कोणत्या उपयांनी ते प्रत्यक्षात आणू शकतो हे नमूद केले आहे. यात स्वामी विवेकानंदांचे ३६५ विचारांचा समावेश आहे.”
पं. वसंतराव गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले. अर्पिता वैशंपायन यांचे गीत गायन झाले. तसेच, आसावरी गुणे करमरकर यांनी सरस्वती वंदना केली.
प्रा.गौतम बापट यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.मिलिंद पात्रे यांनी आभार मानले.