प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञान-विज्ञान-ब्रह्मऋषि पुरस्कार प्रदान सोहळा!
पुणे: पुण्यातील सात नामांकित विनाअनुदानित विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे थोर सुपुत्र, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांच्या अमृत महोत्सव – ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञान-विज्ञान-ब्रह्मऋषि पुरस्कार प्रदान सोहळा सोमवार दि.१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १०.१५ वा. ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ज्ञान-विज्ञान, शिक्षण, राष्ट्रसेवा व मानवकल्याणाच्या अनुषंगाने जीवनभर केलेल्या कार्याबद्दल त्यांना तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञान-विज्ञान-ब्रह्मऋषि पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची सुवर्णजडीत प्रतिमा, सन्मानपत्र, सुवर्णपदक, रु. १,२५,०००/- (रु. सव्वालक्ष), शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या समारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले असून, अध्यक्ष शिवशाहीर मा.श्री. बाबासाहेब पुरंदरे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ.शां.ब.मुजुमदार, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.डी.वाय.पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.पतंगराव कदम व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या शुभहस्ते सदरील पुरस्कार प्रदान केला जाईल.
सदरील पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. पी. डी. पाटील, प्रा. राहुल वि. कराड, डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. विश्वजीत कदम, डॉ. मंगेश तु. कराड, प्रा. सोमनाथ पाटील, प्रा. स्वाती मुजुमदार, प्रा. अजिंक्य पाटील, डॉ. भरत अग्रवाल यांच्या संयुक्त संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानावर आधारित, राजबाग, लोणीकाळभोर येथील एमआयटी विश्व शांती संगीत कला अकादमीतर्फे “विश्व शांती सांस्कृतिक संध्या” हा कार्यक्रम त्याच दिवशी सायं.५.१५ ते रात्री १०.०० वाजेपर्यंत शनिवारवाडा प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. यामध्येे ह.भ.प. श्री.धर्मराज महाराज हांडे यांचे भजन व कीर्तन, सुप्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे यांचे अभंगगायन, सौ. सुवर्णा माटेगांवकर यांचा सुगम संगीत गायन आणि पं.उपेंद्र भट यांच्या अभंगवाणीने या संध्येचा समारोप होणार आहे.