प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळावा -डॉ. अरूण निगवेकर
पुणे :“ देशात प्रत्येक नवजात बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळायला पाहिजे. त्यासाठी संबंधित कायद्यांची प्रामाणिक अंमलबजावणी झाली पाहिजे.,”असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण निगवेकर यांनी केले.
बुकमार्क पब्लिकेशन्स, पुणे आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या वतीने व्यवस्थापनाचे माजी प्राध्यापक डॉ. अरविंद अ. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या सप्तरंग, आपले व्यवस्थापन आपल्या हाती आणि अध्यात्म चिंतन या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निगवेकर बोलत होते. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ प्रा.डॉ.प्र.चिं. शेजवलकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. रामभाऊ जोशी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे व बुकमार्क पब्लिकेशनचे श्री.पराग पिंगळे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. अरूण निगवेकर म्हणाले,“२१ व्या शतकात शिक्षण पद्धतीची खर्या अर्थाने उकल करून चर्चा होत नाही. भारतातील राज्या-राज्यातील शिक्षणपद्धतीत मोठ्या प्रमाणात फरक आहे. तरी सुद्धा तेथील शिक्षक वर्ग विद्यार्थांना ज्ञान देण्याचे कार्य उत्तम पद्धतीने करीत आहेत. आपल्या देशातील युवकांसमोर सर्व प्रकारच्या नवनिर्मितीचे आह्वान आहे. पण त्यांनी माणुसकी मात्र विसरता कामा नये. मानवा-मानवाला एकत्रित कसे करता येईल, यावरही मोठ्या प्रमाणात संशोधन होणे गरजेचे आहे.”
“जग बदलत आहे आम्ही २००१ ते १० या एका दशकाद्वारे २१ व्या शतकामध्ये प्रवेश केला आहे. केवळ स्वातंत्र्य मिळवून देणार्यांविषयी कृतज्ञतेला चिकटून बसणे हे योग्य नाही. त्यामुळे २१ व्या शतकातील पिढीने आधुनिक शिक्षणाचा ध्यास घेऊन माणुसकीसुद्धा जपली पाहिजे.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ दासबोध हा व्यवस्थापनावरील सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे. त्यात व्यवहार आणि जीवन कसे जगावे याचे सुद्धा सखोल ज्ञान रामदास स्वामींनी नमूद केले आहे. ज्याचा उपयोग आजच्या युगात सुद्धा होत आहे. त्यामुळेच २१ व्या शतकात विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय करण्याचे ज्ञान नव्या पिढीला द्यावे लागेल. प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये याचे सार समाविष्ट झालेले आहे.”
डॉ. अरविंद कुलकर्णी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले,“ तीन पुस्तकांचे प्रकाशन एकाच वेळी होणे हा माझ्या जीवनातील ऐतिहासिक क्षण आहे. गेल्या ५० वर्षांच्या कालखंडामध्ये आलेल्या अनुभवातून या पुस्तकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. मोजकेच वाचावे, त्याचे मनन करावे, त्यानंतर त्याचे चिंतन करावे या पद्धतीने जीवन जगतांना त्याचे कसे व्यवस्थापन करावे इ. गोष्टींचा समावेश यात सामवलेला आहे.”
डॉ.शेजवलकर म्हणाले,“ आपण अमेकिन, जपानी इ. व्यवस्थापन पद्धतींचे अध्यापन करतो. पण भारतीय व्यवस्थापन पद्धती देशातील प्रत्येक विद्यापीठामध्ये शिकविली गेली पाहिजे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांनी जीवनाचे खरे व्यवस्थापन आपल्या ग्रंथांतून मांडले आहे. त्यामुळे नव्य पिढीला शिक्षण देतांना त्यात अध्यात्माचाही समावेश करावा. शहरी, ग्रामीण, कृषी, एकंदरीत सर्व क्षेत्रात व्यवस्थापन कसे असते, हे लेखकांनी आपल्या अनुभवातून त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे.”
डॉ.रामचंद्र देखणे म्हणाले,“ प्रा. अरविंद कुलकर्णी यांनी अध्यात्मावर पुस्तक लिहिले आहे. हा अतिशय बोजड समजला जाणारा विषय त्यात अगदी सोप्या पद्धतीने सांगितला आहे.”
रामभाऊ जोशी म्हणाले,“ अध्ययन, मनन आणि चिंतन करून लेखकांने या तीन पुस्तकांची निर्मिती केली आहे. यात मानवी स्वभाव आणि उच्च विचारांचे दर्शन घडते.
यावेळी अस्मिता साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री. पराग पिंंगळे यांनी पुस्तक प्रकाशन समारंभाच्या पाठीमागील भूमिका स्पष्ट केली.
प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अपर्णा दीक्षित यांनी आभार मानले.