पुणे- “मानवी जीवन सुखी करण्यासाठीच धर्म अस्तित्वात आले. शिवाय त्या-त्या काळातील भयंकर सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने उद्धारासाठी संतांनी मानवाला सुखी करण्याचा उपदेश केला. संतश्री ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया रचून मनुष्याला भक्ती करण्यास शिकविली. ज्ञानेश्वरी ही मानवाच्या मनातील अज्ञान घालवून जीवन प्रकाशमय करणारी आहे.,”असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहसचिव आणि कायदेविषयक सल्लागार श्री.मदन गोसावी यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २२व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना ‘ज्ञानदेवाचा भागवत आणि वर्तमान स्थिती आणि प्राप्त परिस्थिती ’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. याप्रसंगी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, वरिष्ठ पत्रकार डॉ.वेद प्रताप वैदिक, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर व प्रा.मिलिंद पात्रे उपस्थित होते.
श्री.मदन गोसावी म्हणाले,“ज्ञानेश्वरांच्या नुसत्या एका ओवीची अनुभूती घेतली तर मानवी जीवनाबरोबरच समाजजीवनही सुखी होईल. व्यवहाराबरोबच कर्मयोग कसा आचरावा, याचे ज्ञान त्यांनी दिले. ते आचरणात आणल्यावर मानव सदैव दुखापासून निवृत्त होतो. वारकरी संप्रदाय हा मानवला जोडून धरणारा मार्ग आहे. मानव हा अंतकरणाने दयावन असतो. या सृष्टीवरील ३०० धर्मात एकच शिकवण आहे, ती म्हणजे सर्वांवर प्रेम करा. हीच शिकवण माऊलींनी देऊन सामाजिक जीवन सुखी करण्याचे कार्य केले आहे. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया रचला तर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी कळस उभारला आहे.”
डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“भारत ही ऋषि मुनी, तपस्वी आणि संतांची भूमि आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, ही शिकवण आम्हाला संतानी दिली आहे. सर्व धर्मग्रंथ हे खर्या अर्थाने जीवन ग्रंथ आहेत. कसे जगावे व कसे जगू नये याचे सार त्यामध्ये आहे. .”
सकाळच्या सत्रात प्रबोधन कार्यशाळेत स्वरप्रकाशित चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉ. सुनील काळे व सुप्रसिध्द तत्त्वज्ञ व विचारवंत डॉ. दत्तात्रय तापकीर यांची व्याख्याने झाली.
डॉ. सुनील काळे म्हणाले,“मानवचा आंतरिक व बाह्य विकास हा त्याच्या विचारांवर आधारित असतो. त्यामुळे शुद्ध आचार-विचार हा सर्व परिवर्तनाचा स्त्रोत आहे. या विश्वात शांती स्थापित करावयाची असेल, तर ओम ध्वनी अर्थात प्रार्थना हे सर्वात मोठे साधन असेल. विज्ञानाने प्रयोगाद्वारा हे सिद्ध केले आहे, कि मानवी विचारांच्या आधारे तो सृष्टीमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. प्रेम आणि शांती या दोनच गोष्टी अशा आहेत, की ज्या तुमच्या शरीरातील पेशींना युवावस्थेत आणण्याचे कार्य करते. त्यामुळे पुढची पिढी उत्तम घडविण्याचे कार्य हे तुमचे विचारच करू शकतात.”
व्यक्तिमत्व विकासासाठी आध्यात्मिक बुध्यांक या विषयावर प्रतिपादन करताना डॉ. दत्तात्रय तापकीर म्हणाले, “मानवाला आनंदी राहण्याचे सर्वात मोठे सूत्र म्हणजे सर्व धर्मांचा यथाशक्ती अभ्यास करणे, सर्वधर्म सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव, सर्वधर्मममभाव निर्माण होणे गरजेचे आहे. मी कोण आहे, याचा शोध घेतांना फक्त मन आणि बुद्धीचाच शोध लागतो. कारण पंचमहाभूतांनी बनलेले हे शरीर शेवटी मातीतच मिळणार आहे. त्यामुळेच बुद्धिपर्यंत जाऊन केलेले अध्यात्म म्हणजे आध्यात्मिक बुध्यांक असे आपण म्हणू शकतो.”
प्रा.मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.
धर्मग्रंथातील उपदेश सर्वसामान्यांपर्यंत नेले पाहिजेत – मदन गोसावी यांचे प्रतिपादन;
Date: