इतिहासात प्रत्येक दिवसाला एक महत्त्व असते ते त्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटनांमुळे. या ऐतिहासिक घटनांचा परिणाम तत्कालीन समाजावर होतोच शिवाय भविष्यातही त्याची नोंद घेतली जाते. आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस. 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावची लढाई झाली होती. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला होता. तर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा आजच्या दिवशी सुरू केली होती. जगाच्या इतिहासात अजरामर घटना असलेली क्युबन क्रांतीदेखील आजच्या दिवशी घडली होती.
1664 : सुरतेच्या लुटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुरतमध्ये दाखल
मोगल सरदार शाहिस्तेखान सलग तीन वर्षे महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गुजरातमधील सुरत शहर सुरत शहर लुटण्याची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली. सुरतेतील आर्थिक आणि भोवतीच्या सैनिकी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला मुख्य हेर बहिर्जी नाईक याची नेमणूक केली. सुरतेची बित्तंबातमी काढून बहिर्जीने शिवाजी महाराजांची भेट घेतली व सुरतेवर हल्ला केला असता मोठा खजिना हातात येईल असे सांगितले. यावर मसलत करून महाराजांनी सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला. त्यासाठी 1 जानेवारी 1664 रोजी शिवाजी महाराज सुरतमध्ये दाखल झाले. त्यानंतर 5 जानेवारी 1664 रोजी आपल्या घोडदळासह सूरतेत थडकून शिवाजी महाराजांनी आपली मोहीम यशस्वी केली होती.
1818 : कोरेगाव भीमाच्या लढाईत पेशव्यांचा निर्णायक पराभव
महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांमध्ये ही लढाई झाली होती. भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त 500 सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या 25,000 सैन्याचा पराभव केला. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने 25 हजाराच्या सुमारास सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता
कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ 12 तास लढाई केली. मोठ्या ब्रिटीश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली. ही लढाई इंग्रज-मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाचा भाग होती. या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली. यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली.पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महारांना,अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले असल्याचे म्हटले जाते. ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारला.
1848 : भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
महात्मा जोतीबा फुले यांनी अहमदनगरमध्ये ख्रिस्ती मिशनरीं मार्फत चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या शाळेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. तेव्हापासून भारतातील प्रथम महिला शिक्षिका म्हणून सावित्राबाई फुलेंचे नाव घेतले जाते.मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या या शाळेला सनातनी, कर्मठांनी जोरदार विरोध केला होता. मात्र, या विरोधाला न जुमानता शाळा सुरू राहिली. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली.
1862 : भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली
आजच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 1862 रोजी भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली. त्याआधी 6 ऑक्टोबर 1860 रोजी त्याला मान्यता देण्यात आली होती. आयपीसी म्हणून प्रसिद्ध भारतीय दंड संहिता हा भारताचा प्राथमिक गुन्हेगारी कायदा आहे, जो गुन्हेगारी कायद्यातील प्रत्येक भौतिक बाबी विचारात घेतो. 1862 पासून या कायद्यात बर्याच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. हे देशातील सर्व संभाव्य गुन्हे आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षेची व्याख्या करते.