नागपूर(दिनांक ११ डिसेंबर२०२३ )
अजित दादांना तुम्ही मुख्यमंत्री करा, लगेच पाठिंबा देतो. माझ्या पक्षाची जबाबदारी मी घेतो. तुमच्यात आहे का, दम असा सवाल करत भास्कर जाधव यांनी भाजप आमदारांचे तोंड बंद केले. तर ते पुढे म्हणाले की, तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या सोबत मैत्री कराल त्यांचं वाटोळं कराल. असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
कोकणातील विकासासंदर्भात विधिमंडळात चर्चा सुरु असताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि सत्ताधारी भाजप आमदारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी बाकावरील आमदारांनी तुमचे सरकार अडीच वर्ष होते तेव्हा कोकणाचा विकास का केला नाही. आत्ता काय चर्चा करता, अशी टीका केली. तेव्हा भास्कर जाधव यांचा पारा सभागृहात चढला आणि त्यांनी भाजप आमदारांना जोरदार टोलेबाजी करत त्यांचा आवाज गप्पच केला.
आमदार भास्कर जाधव म्हणाले की, यांना फक्त अडीच वर्ष, अडीच वर्ष… अडीच वर्ष…! दुसरे काही सूचत नाही का, सकाळ संध्याकाळ अडीच वर्ष एवढंच आठवते का? कोरोना का आम्ही आणला का? कोणी आणला कोरोना?, कशाप्रकारे झोपाळ्यावर जाऊन ढोकळा आणि पारडी खात बसलात, त्यानंतर विमानं बंद केली. कोरोना तुम्ही आणलात?
यांच्यात दम काय, तुम्ही ज्याल तिकडं तुम्हाला खाण्यातंच दिसते. हे खाल्लं ते खाल्लं हेच दिसते. दुसरं काय दिसतं तुम्हाला. मुळात तुमच्या पोटात अडीच वर्षांचा काळ दुखतोय. युपीतलं प्रेत रस्त्यावर होती, मध्यप्रदेशमधील प्रेत रस्त्यावर होती, गुजरातमधील प्रेत रस्त्यावर होती. पण आमच्या महाराष्ट्रात सन्मानाने काम चालू होते. महाराष्ट्राचे कौतुक होते. डब्ल्यूएचओने, सुप्रीम कोर्टाने, राष्ट्रपतीसह पार्लमेंट व जगाने देखील कौतुक केले. हेच यांच्या डोळ्यात खुपतं, असे म्हणत भास्कर जाधव यांनी सत्ताधारी आमदारांवर जोरदार हल्लाबोल.