
पुणे-सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन् मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेले हजारो वारकरी पुणे मुक्कामी आहेत. हाती टाळ घेऊन हरिनामाच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत चिमुकल्यांनी केलेले प्रेमळ स्वागताने वारकरी बांधव भारावले.
निमित्त होते दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे पालखी सोहळयात पुणे मुक्कामी वारकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचे. यंदाही अनोख्या पध्दतीने वारकऱ्यांचे चिमुकल्या वारकऱ्यांनी साक्षात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन देऊन स्वागत करण्यात केले. चुमुकले वारकरी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या रूपातील मुलांचे शाही स्वागत अनुभवताना वारकरीही भारावले होते. यावेळी नव्या पिढीला कुसंस्कारांपासून दूर ठेवून सुसंस्कार त्यांच्या मनात रुजवणे ही काळाची गरज ओळखून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकारातून सुरु केलेल्या ‘हरवलेले संस्कार’ या उपक्रमाची फलश्रुती यंदाच्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पुणे मुक्कामी अनुभवयास मिळाली. राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेषभूषेत केलेले प्रेमळ स्वागत पाहून प्रसिद्ध श्री. लक्ष्मीमाता मंदिर परिसरात विसावलेले वारकरी भारावले आणि या उपक्रमाबद्दल वारकऱ्यांनी विशेष कौतुकही केले.
यंदाही शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी माता मंदिरात वारकऱ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर सर्व धर्मियांकडून वारकरी बांधवांच्या पायाला तेलाने मालिश करण्यात आली. शिवाय डॉ कल्पेश पाटील यांस कडून सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी वारकऱ्यांची ब्लडप्रेशर, शुगर तपासणी करून औषधोपचार केले तसेच वारकऱ्यांसाठी दाढी करणे,चप्पल बुटांची दुरुस्ती ही व्यवस्थाही करण्यात आली. वारकरी बांधवांना भजनासाठी उत्तम व्यवस्था श्री लक्ष्मी माता मंदिरात करण्यात आली.
यावेळी आबा बागुल म्हणाले की, जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन आम्ही गेली ३१ वर्षे वारकऱ्यांची सेवा करत आहोत. पंढरीच्या वाटेवर जाणाऱ्या वैष्णवांचे पाद्यपूजन करून त्यांचे स्वागत करण्यात येते.यंदा हरवलेले संस्कार मालिकेअंतर्गत राजीव गांधी ई लर्निंग स्कुलच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत विशेष सहभाग घेतल्याने या संस्कार मालेच्या उद्देशाच्या फलश्रुतीचा आनंद अधिक असून ही संस्कार मालिका एक लोकचळवळ व्हावी हा मानस आहे.
यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी नंदकुमार बानगुडे, घनशाम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल,हेमंत बागुल ,सागर बागुल, तसेच महेश ढवळे सागर आरोळे,अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी, समीर शिंदे,विश्वास दिघे, संतोष पवार, बाबासाहेब पोळके,सुरज सोनावणे व कार्यकर्ते उपस्थित होते.