त्या घटनेनंतर येरवड्यातील नागरिकांचा पुढाकार
पुणे – बकरी ईदच्या दिवशी येरवडा परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाले होते. गल्लीत बकरे पळत असताना एका मुलीला धक्का लागला आणि ती मुलगी खाली पडली. मुलीचे पालक याचा जाब विचारण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे गेले आणि वादाला तोंड फुटले. दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत येरवड्यातील विश्वकर्मा कुटुंबीयांना मारहाण झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारही दाखल करण्यात आली. मात्र येरवड्यात घडलेल्या या घटनेने वेगळे वळण घेतले. धार्मिक वातावरण तयार झाले.
हिंदू गर्जना मोर्चा आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने या प्रकरणी मोर्चा काढण्याचे आवाहन केल्याच्या क्लिप वायरल झाल्या. त्या पार्श्वभूमीवर येरवडा पोलिसांनी येरवडा परिसरातील दोन्ही धर्माच्या नागरिकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या बैठकीला नागपूर चाळ परिसरामधील डॉ.सिद्धार्थ धेंडे, महेश पाटील, बादशाह भाई शेख, मोहम्मद भाई, खरात, मस्के, संतोष विश्वकर्मा, नाना नलवडे यांच्यासह इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते. या बैठकीनंतर दोन्ही गटातील नागरिकांनी इथून पुढे कोणत्याही मोर्चात सामील होणार नसते ते सांगितले. सामाजिक सलोखा टिकून ठेवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असे आश्वासन देखील या नागरिकांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.