रायगड -खूर्च्या येतील जातील, पण खूर्चीसाठी लाचार होणारी ही औलाद नाही. अहो, वारकऱ्यांना आमच्या सरकारने 20 हजार देण्याचा निर्णय घेतला, तर काही लोकांची पोटदुखी वाढली, त्यांना पोटसूळ सुटली. पण त्यांच्यासाठी देखील बाळासाहेब ठाकरे आपला मोफत दवाखाना काढलेला आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटांवर हल्लाबोल चढवला.
रायगड किल्ल्यावर आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. सुनील तटकरे, आदिती तटकरे, भरत गोवावलेंसह हजारो शिवभक्तांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, हजारो शिवभक्त येथे जमले त्यांना मी धन्यवाद देतो व त्यांचे अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधींची या ठिकाणी उपस्थिती आहे. हे राज्य शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या घराघरामध्ये व मनामनांमध्ये शिवछत्रपती आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने हे सरकार काम करत आहेत.
शिवरायांनी दिलेल्या स्वराज्य शब्दाने सर्वांना प्रेरणा दिली आहे. तोच शब्द लोकमान्य टिळकांनी वापरला. स्वराज्याच्या संकल्पनेतून महाराजांचा शिवराज्याभिषेक झालेला आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात ही शिवरायांच्या पूजनाशिवाय होत नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. स्वराज्यातून सुराज्य निर्माण करण्याचे काम हे सरकार काम करत आहे. या सोहळ्याला आलेले लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळ वारे आहे, तरी देखील कोणीही या ठिकाणाहून हालत देखील नाही. कारण हा शिवरायांचा मावळा आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार हे लंडन मधून वाघनखं आणणार आहेत, राज्य सरकार तुमच्या पाठिशी आहेत. शिवभक्त देखील तुमच्या पाठिशी आहे. ‘मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे’ अशी टीका करणाऱ्यांचे तोंड बंद करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम देखील मोदींनी केले, असेही शिंदे म्हणाले.एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील साल्हेर, विजयदुर्ग, पन्हाळा यासह 11 किल्ल्यांचा इतिहास हा सातासमुद्रापलिकडे गेला आहे. तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा करण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. शिवरायांची जयंती व राज्याभिषेक सोहळा जेवढा वेळा करू तेवढा कमीच आहे. कारण शिवरायांचा त्याग समर्पण हे मोठे होते आणि कायम राहणार आहे. शिवरायांची उंची येवढी मोठी होती, की दररोज जरी कार्यक्रम घेतला तरी तो कमी पडणार आहे. शिवरायांचे सवंगडी कोण आहे. शेतकरी, कष्टकरी हे होते. तोच विचार घेऊन हे सरकार काम करत आहे.
शिंदे म्हणाले की, काही शिवभक्तांनी मला निवेदन दिले आहे. ते निवेदन मी स्वीकारले आहे. तुमच्या मनात जे आहेत. तेच माझ्या देखील मनात आहे. परंतु त्याला थोडा वेळ द्या, विश्वास ठेवा, मी योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करेन, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी रायगडालगत असलेल्या दर्गाच्या मुद्द्याला अप्रत्यक्ष हात घातल्याचे पाहायला मिळाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसृष्टीला 50 कोटी मंजूर केले. त्यात पुन्हा वाढ करून दिली जाईल. वारकरी आषाढी-कार्तिकीला पंढरपूरात जातात. आषाढी वारी कशी जोरदार झाली पाहिजे ना. त्यामुळेच प्रत्येक दिंडीला प्रत्येकी 20 हजारांची मदत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. वारकऱ्यांचा पाच लाखांचा विमा देखील उतरवला. तरी देखील सगळी सगळी व्यवस्था केली. समोरून पोटसूळ उठला. त्यांना अॅसिटीडी झाली, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना टोला लगावला.