अजित पवार यांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही दिल्लीतील चाणक्यांनी रणनीती असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या माध्यमातून अजित पवार बाहेर पडले तर राज्यात तिरंगी लढत होईल. आणि सर्वसामान्य जनतेची मते विभागली जातील, त्याचा फायदा भाजपला घ्यायचा असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. भाजपचा पराभव हा अजित पवारांमुळे नाही तर भाजपच्याच शेतकरी आणि युवा विरोधी धोरणांमुळे झाला असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी अजित पवार यांना बळीचा बकरा केले जात असल्याचा आरोपही केला आहे. इतकेच नाही तर आता अजित पवार यांना भाजपने वेगळे केले तरी त्यांना फारसा फायदा होणार नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांची पोस्टही पहा….
मविआच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आरएसएसच्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे.
परंतु मुळात भाजपचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही तर भाजपच्याच शेतकरी, युवा विरोधी धोरणांमुळे झालेला आहे. भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे, जनतेला गृहीत धरून चालण्याच्या वृत्तीमुळे, पक्ष फोडण्याच्या कृत्यांमुळे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजितदादांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही. शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या, मराठी स्वाभिमान गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, याची दखल चाणक्यांनी घ्यायला हवी.