ही आहेत बदल केलेली ठिकाणे1)बोपोडी – १९८७ च्या रचनेप्रमाणे पूर्वी हॅरीस पुलाच्या अलीकडे डीपी रस्त्याला हा रस्ता जोडला जाणार होता, आता नव्या बदलानुसार रेल्वे पूल ओलांडून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रस्त्याला जोडला जाईल.2)गणेशखिंड – प्रतितास ५० किलोमीटर या वेगाने वाहने जावेत यासाठी चतुःश्रृंगी मंदिराच्या समोरच्या बाजूस रस्ता स्थलांतरित केला आहे.3)पासपोर्ट कार्यालय – पूर्वीचा रस्ता वनविभागाच्या जागेतून जात होता. त्याऐवजी २०१७ च्या विकास आराखड्यात दाखविण्यात आलेल्या बालभारती पौडफाटा रस्त्यावरच दाखविण्यात आला आहे. याची रुंदी २४ मीटर इतकी असणार आहे.4)कासट पंप – कासट पेट्रोल पंप येथे कर्वे रस्त्यावर वळण कमी करण्यासाठी रस्त्याच्या रचनेत बदल केला आहे.5)गांधी लॉन्स ते अलंकार पोलिस ठाणे – गांधी लॉन्स ते अलंकार पोलिस ठाणे या दरम्यान नाल्यावरून एससीएमटीआर मार्ग आखला आहे, तीव्र वळण कमी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.6)साकेत पूल ते सिंहगड रस्ता – साकेत पुलावरून म्हात्रेपुलाकडे एचसीएमटीआर मार्ग न नेता तो थेट मुठा नदी ओलांडून नवशा मारूती मंदिराकडे नेला जाणार आहे. नवशा मारुती चौकातून सिंहगड रस्ता, दांडेकर पूल, सारसबाग चौक, पाटील प्लाझा असा नवा रस्ता असेल. पूर्वीचा दत्तवाडीतून येणाऱ्या रस्त्याचे आरक्षण रद्द केले आहे.7)डिफेन्स कॉलनी – डिफेन्स कॉलनी येथे एचसीएमटीआर मार्गाचे रॅम्प येणार आहेत. त्यासाठी २४ मीटरचा रस्ता ४२ मीटर इतका केला जाईल.8)एसआरपीएफ – पूर्वीचा रस्ता एसआरपीएफच्या सीमा भिंतीजवळून जाणार होता, पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यावर हरकत घेतल्याने सुमारे एक किलोमीटर लांबीच्या मार्गात बदल केला आहे.9)वडगाव शेरी – ताडीगुत्ता चौकातून मुळामुठा नदी ओलांडून हा रस्ता नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलच्या दिशेने जाणार आहे. रॅम्पसाठी रस्त्याची रुंदी वाढवली आहे.10)साकोरेनगर – लष्कराच्या संवेदनशील परिसराजवळून हा रस्ता जात असल्याने तेथे बदल केला आहे.विमानतळ – विमानतळ ते ५०९ चौक या दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्याच्या रचनेत बदल केला आहे.11)लक्ष्मीनारायण चित्रपट गृह – लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाकडून डायस प्लॉट ते गंगाधाम चौक असा पूर्वीचा रस्ता होता. आता नवीन बदलानुसार लक्ष्मीनारायण टॉकीज ते बिबवेवाडी चौक, बिबवेवाडी कोंढवा रस्ता ते गंगाधाम चौक असा बदल केला आहे.
म्हात्रे पूल, दत्तवाडीचा भाग वगळला:एचसीएटीआर’च्या पूर्वीच्या आराखड्यात साकेत पुलावरून नाल्यातून हा मार्ग डीपी रस्त्यावर आणलेला होता. तेथून म्हात्रे पूल ओलांडून दत्तवाडीतून आंबील ओढ्यातून सारसबाग चौकापर्यंत हा मार्ग येणार होता. पण दाट वस्ती व रचनेतील अडथळ्यांमुळे हा भाग वगळून एचसीएमटीआर मार्ग सिंहगड रस्त्यावर आखला आहे. आता याच ठिकाणी खडकवासला ते हडपसर मेट्रोचाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे येथे एचसीएमटीआर मार्ग कसा होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुणे:शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वर्तुळाकृती उच्च द्रुतगती उन्नत महामार्गावर (एचसीएमटीआर) प्रमुख १२ ठिकाणी २६ बदलांसह पुणे महापालिकेने पाठवलेल्या प्रस्तावास राज्य सरकारने अंतिम मान्यता देऊन त्याबाबत अधिसूचना काढली आहे.काही ठिकाणी रॅम्पसाठी रुंदीकरण, काही ठिकाणी तीव्र असणार वळण कमी करण्यासाठी बदल केला जाणार आहे. दत्तवाडी आणि लक्ष्मीनारायण चित्रपटगृह या दोन ठिकाणी एचसीएमटीआरचा मार्ग पूर्णपणे बदलून तो नव्याने आखण्यात आला आहे.पुणे महापालिकेच्या १९८७च्या विकास आराखड्यात शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी म्हणून ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प निश्चीत करण्यात आला. या वर्तुळाकृती रिंगरोड मुळे वाहतूक सुरळीत होईल असा दावा केला जात होता. मात्र, गेल्या ३५ वर्षात या प्रकल्पाचे इंचभर देखील काम प्रत्यक्षात झाले नाही. २०१७ मध्ये या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेत निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र कक्षही तयार करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी मागविलेल्या निविदेत ५२०० कोटीचा खर्च अपेक्षीत असताना निविदेमध्ये तो तब्बल १२ हजार कोटी पर्यंत दाखविण्यात आला. त्यामुळे ही निविदा रद्द करण्यात आली.महापालिकेच्या १९८७ विकास आराखड्यात ‘एचसीएमटीआर’चा समावेश होता, त्यानंतर २०१७ च्या विकास आराखड्यातही हे आरक्षण कायम ठेवले होते. पण या आरक्षणामध्ये वाहतुकीस अडथळा येत असल्याचे सांगत महापालिकेच्या आॅक्टोबर २०२१ च्या मुख्यसभेत एचसीएमटीआर मार्गामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन बहुमताच्या जोरावर उपसूचना देऊन हा प्रस्ताव मंजूर केला होता. यामध्ये मोठ्याप्रमाणात भाग निवासी केला जाणार असून, बांधकाम व्यावसायिकांचा फायदा होणार असल्याचा आरोप करण्यात आला होता. सर्व बदलांसह महापालिका प्रशासनाने मार्च २०२३ मध्ये एचसीएमटीआर मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (२) अन्वये मान्यता देण्यात आली आहे.