मुंबई दिनांक ९ मे २०२४
मुंबईत झालेल्या १९९३ मधील बॉम्बस्फोटचा आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहे. मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत आहे. त्यामुळे ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगचा लढा आहेच, परंतु ही लढाई भारत आणि पाकिस्तानची लढाई झालेली आहे, अशी टीका मुंबईतील भाजपा आमदार अमित साटम यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की, ते नेमके कोणासोबत आहेत? ते मुंबईकरांसोबत आहेत की, १९९३ वेळी ज्यांनी मुंबईकरांना त्रास दिला त्यांच्यासोबत आहेत? असा सवालही आ. अमित साटम यांनी विचारला आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब खूपच संतापलेले होते आणि त्यांनी अत्यंत परखड भूमिका घेतली होती. पण तुम्ही आता १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींनाच सोबत घेतलंय. तुम्हाला मुंबईकरांना नेमकं काय द्यायचंय? असा प्रश्नही आ. अमित साटम यांनी उबाठा गटाला लक्ष करत विचारला आहे.