सातगाव पठार भागात डॉ. कोल्हेंचा गावभेट दौरा.
पारगाव पेठ – शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा आज आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात सुरू झाला यावेळी पारगाव तर्फे खेड या गावातून नवखंड भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन कुरवंडीच्या चोंभाबाई देवीच्या अखंड हरीनाम सप्ताहमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
यावेळी सातगाव पठार भागाला सर्वात जास्त भेडसावणारा शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर स्थानिक युवकांनी डॉ. कोल्हे यांचे लक्ष वेधले. ज्याप्रकारे बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा शब्द पळाला तसा पाण्याचा देखील प्रश्न सोडवा अशी साद युवकांनी घातली. कळमोडीचे पाणी आम्हाला मिळत नाही तरी देखील आमच्या शेतजमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के लाधले आहेत. हे उठविण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती कार्यकर्त्यांनी डॉ. कोल्हे यांना केली. त्यावर डॉ. कोल्हे यांनी देखील पाण्याच्या विषयात बारकाईने लक्ष घालण्याची हमी दिली, याशिवाय जर कळमोडी प्रकल्पाचा लाभ मिळत नसेल, अर्थात लाभक्षेत्र नसेल तर पुनर्वसन काय कामाचे आपण सर्वजण मिळून यासाठी संघर्ष करू त्यासाठी तुमची साथ महत्वाची असल्याचे मत देखील डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.
दरम्यान पारगाव येथे अशोक पवार या युवा शिवसैनिकाने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आढळराव पाटील यांचा १५ वर्ष एकनिष्टतेने प्रचार आम्ही शिवसैनिकांनी केला परंतु या माजी खासदारांनी राष्ट्रवादीमध्ये जाताना विश्वासात घेतले नाही, केवळ राष्ट्रवादी आपल्याला संपवत आहे, आपण शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करतोय असं कार्यकर्त्यांना भासवून जनतेला १५ वर्षे भावनिक केलं. मला आता मंत्रिपद मिळणार आहे असं खोटं बोलून आढळराव पाटलांनी वारंवार खासदारकी मिळवली.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी सातगाव पठार या भागासाठी पाणी कशा प्रकारे मिळू शकते याशिवाय राज्यकर्त्यांनी या भागाला इच्छाशक्ती अभावी पाण्यापासून कशा प्रकारे वंचित ठेवलं याचा पाढा वाचला. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले की आम्ही मतदार नव्हतो तेव्हापासून पाणी मिळणार हे ऐकतोय आता आमची मुलं मतदार झाली पण अजूनही आम्हाला पाणी मिळालं नाही.
दरम्यान कारेगाव येथील माजी सरपंच बबन रामभाऊ कराळे यांनी भाजप सरकारवर नाराजी व्यक्त करत ही लढाई केवळ डॉ. कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी नसून ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी अशी लढाई आहे. ही लढाई जिंकण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली असल्याचा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.
यावेळी सुरेश भोर, देवदत्त निकम, पूजा वळसे पाटील, दिलीपराव पवळे, भरत मोरे, हेमंत एरंडे, अशोक पवार, सूर्याजी सावंत, धनंजय जाधव, गणेश चिखले, प्रशांत, आचार्य, शुभम जेकटे, सुरेखा निघोट, विजय शेटे, बाळासाहेब गटे, उमा माटे यांसह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आढळरावांनी आपला पराभव मान्य केलाय – खासदार डॉ. अमोल कोल्हे
आंबेगाव : केंद्रातील सत्ता ही बदलत आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येत असल्याने केंद्रात सत्तेतील खासदार निवडून द्या हे विधान करून आढळराव यांनी आपला पराभव मान्य केला असल्याचा टोला खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, सुरेश भोर, दिलीप पवळे, सुनील तोत्रे, मनीषा तोत्रे, निलेश वळसे, पुजा वळसे, विजय शेटे आदी उपस्थित होते.
२०२४ ची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे, या निवडणुक प्रचारात धोरणात्मक मुद्दांवर बोललं जाईल ही अपेक्षा होती. मात्र, खोट बोल पण रेटून बोल यासवयीबरोबरच पंधरा वर्षांच्या अपयशाची पोटदुखी होत असल्याने वैयक्तिक टिका केली जात असल्याचं प्रतिउत्तर डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिल.
डॉ. कोल्हे यांच्यावर आढळराव पाटलांकडुन सातत्याने वैयक्तिक टिका केली जातीये. त्यावर प्रतिउत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले की, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत धोरणात्मक बाबींवर बोलावं, पण त्यांच्याकडे वेगळे मुद्देच नाहीत. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे तीच तीच वाक्य फिरवून ते बोलतायत. पंधरा वर्षातल त्यांचं अपयश आहे. पाच वर्षात शेतकऱ्यांच्या पोराने काम मार्गी लावली त्याची ही पोटदुखी आहे, असा टोला ही डॉ. कोल्हे यांनी लगावला.