उद्धव ठाकरे म्हणाले- प्रचार गीतातून ‘जय भवानी’, ‘हिंदू’ काढणार नाही:मोदी-शहांनी देवाच्या नावे मत मागणे निवडणूक आयोगाला चालते का? आधी त्यांच्यावर कारवाई करा
मुंबई-मशाल चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाने नवे प्रचार गीत तयार केले आहे. या प्रचार गीतामधील दोन शब्द काढावे असे निवडणूक आयोगाने सांगितले असून त्यासाठी नोटीस पाठवली आहे. आम्ही जय शिवाजी जय भवानीमधील प्रचार गीतामधील जय भवानी शब्द काढावा असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हुकुमशाहीसमोर आम्ही झुकणार नाही, प्रचार गीतामधून जय भवानी शब्द काढणार नाही,
भवानी मातेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आमच्यावर कारवाई करण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री देवाच्या नावाने मत मागतात ते चालते का? त्यांच्यावर कारवाई करा असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच लोकसभा निवडणूक आयोगाकडून शिवसेना ठाकरे गटाला नोटीस आल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून जय भवानी, हिंदू धर्माचा उल्लेख असलेले शब्द काढा, असे सांगण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका आहेत. त्यासाठी एक प्रेरणा गीत लागते. म्हणून आम्ही आम्ही मशाल गीत काढले आहे. यावर निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र लिहून दोन शब्द काढायला लावले. हिंदू तुझा हा धर्म जाणून घे हे मर्म यामधील हिंदू धर्म शब्द काढायला लावला. तसेच गाण्याच्या बॅकग्राऊंडला असलेल्या जय भवानी, जय शिवाजी घोषणेमधील जय भवानी शब्द काढा, असे निवडणूक आयोगाने सांगितल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाच्या नावावर मते मागतात. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यावर अद्याप निवडणूक आयोगाचे उत्तर आले नाही. ते हिंदू धर्मावर मते मागतात. आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितले नाही. निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यावे, जर आमच्यावर कारवाई करायचे आहे तर यांच्यावर देखील कारवाई करावी लागेल.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही देखील राम भक्त आहोत हनुमान भक्त आहोत. आई तुळजा भवानी राज्याचे दैवत आहे. जय भवानी जय शिवाजी ही आपण घोषणा करतो. हे आम्ही बोलणारच. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कुलदैवतेबद्दल एवढा आकस आहे. ही हुकूमशाही आहे.