अर्धे झालेले पक्ष विकास करू शकणार नाही
भंडारा-अमित शहा म्हणाले की, उद्धव ठाकरे, शरद पवार म्हणतात की, आमचा पक्ष भाजपमुळे तुटला. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांचा पक्ष आम्ही फोडला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहामुळे आणि शरद पवार यांचा पक्ष त्यांच्या मुलीच्या प्रेमामुळे फुटला आहे. त्यांनी विनाकारण भाजपवर आरोप लावण्याची गरज नाही, असे म्हणत अमित शहा यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
शहा पुढे म्हणाले की, परिवारवादी पक्षांनी केवळ स्वत;चा फायदा पाहिला आहे. कुटुंबाचा फायदा पाहिला आहे. आता महाराष्ट्रात अर्धी झालेली शिवसेना व अर्धी झालेली शिवसेनेबरोबर कॉंग्रेस देखील अर्धी झालेली पार्टी बनलेली आहे. त्यामुळे अर्धी झालेल्या पार्टी या राज्याचा विकास करू शकत नाही. मोदींच्या नेतृत्वातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी पक्षच या राज्याचा विकास करू शकेल, असेही अमित शहा म्हणाले.
शरद पवार जेव्हा केंद्रात कृषीमंत्री होते, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रासाठी काय दिलं. काहीही दिले नाही. त्यांनी दहा वर्षात महाराष्ट्रात दिले असेल त्याच्या कितीतरी पट मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला निधी दिला गेला. शरद पवार यांनी दहा वर्षात 1 लाख 91 हजार कोटींचा निधी दिला. तर मोदींच्या दहा वर्षांच्या काळात 7 लाख 15 हजार कोटींचा निधी दिला. रस्त्यांच्या विकासाठी 2 हजार कोटींचा निधी दिला. सर्वच क्षेत्रातील आवश्यक निधी दिला. त्यामुळे या देशाचा आणि राज्याचा विकास मोदींच्या नेतृत्वाखाली होईल, असा विश्वास जनतेला देखील आलेला आहे, असे म्हणत अमित शहा यांनी कॉंग्रेससह शरद पवारांवर हल्लाबोल केला.
कॉंग्रेसने बाबासाहेबांचा अवमान केला
आम्ही बहुमताचा उपयोग हा कलम 370 हटवण्यासाठी केला. ट्रिपल तलाक हटवण्यासाठी आम्ही बहुमताचा उपयोग केला. संविधान बदलण्यासाठी आम्ही उपयोग करणार नाही, जो पर्यंत भाजप आहे तोपर्यंत आम्ही संविधानाचा सन्मान करत राहणार, अधिक मजबूत करत जाणार, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.आम्ही कधीही बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला नाही. पण या कॉंग्रेसवाल्यांनी बाबासाहेब यांना हरण्याचे काम केले. त्यांचा सातत्याने अवमान केला, असे म्हणत अमित शहांनी कॉंग्रेसवर आरोप केला. महायुतीचे भंडारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडाऱ्यात सभा होत आहे. यावेळी अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.