पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर जावून काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आज महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले. ही प्रेरणा देणारी, ऊर्जा देणारी आणि विजयाचे प्रतिक असलेली भूमी आहे, असे ते म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास जागवणारे हे ऊर्जा स्थळ आहे. येथे येवून नेहमीच प्रेरणा मिळते. हीच प्रेरणा घेवून आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरत आहोत. निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा इथे येवून आम्ही माथा टेकवून महाराजांचा आशीर्वाद घेवू, असा निश्चय रवींद्र धंगेकर यांनी केला.
छत्रपतींच्या घराण्यातील आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हेही या निवडणुकीत आमच्यासोबत आहेत. त्यांचाही आम्हाला आशीर्वाद लाभला आहे. जनताही भरभरून आशीर्वाद देईल, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.रवींद्र धंगेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाच्या विरोधात लढा देऊन स्वराज्य स्थापन केले. रयतेचे हित साधले. सर्वसामान्यांचे कल्याण केले. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेसाठी लढा देत समाजाची सेवा केली. समाजसुधारकांचे, संतांचे कार्य जनसेवा करताना कायम स्फूर्ती देणारे आहे.
देशात हुकूमशाही, अराजकता सुरू आहे. आपल्याला लोकशाही वाचविण्यासाठी लढायचे आहे. भाजपच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी जनतेने इंडिया आघाडीला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.