पुणे, दि. २० मार्च : ” एकनाथ महाराज यांनी भारूडाच्या रचनांची ताकद ओळखली होती. परंतू कालानुरूप समाजात याचा जास्त प्रचार झाला नाही. भारुडात नाचणार्या स्त्रीला भारतीय परंपरेत योग्य स्थान नव्हते तरी पण लेखिका पद्मजा कुलकर्णी यांनी पर्वा न करता या कलेसाठी जीवन समर्पित केले आहे. तसेच या चंदाताई यांनी या कलेत शिष्य परंपरा आणली होती.” असे विचार ज्येष्ठ साहित्यीक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे विद्यापीठाच्या कार्याध्यक्षांच्या ज्ञान सभागृहात कवयित्री भारूड साम्राज्ञी श्रीमती पद्मजा कुलकर्णी लिखित ‘ऊॅ श्री माँ अनवट काव्य भारूड संग्रहाचे प्रकाशन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी माजी पोलीस महानिरिक्षक सुरेश खोपडे, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसन्तराव गाडगीळ, गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, आणि ललिता सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,” या पुस्तकात लेखिकेने अध्यात्माबरोबरच व्यावहारिक जीवनाचे विविध पैलूंवरील दर्शन घडविले आहे. त्यांनी देवी देवतांची आरती, भक्ती व अध्यात्म मार्गाला संपूर्ण जगभरात पोहचविण्याचे कार्य केले आहे. भारुड लोककला ही मानवी दुःखांवर फुंकर घालण्याचे कार्य करीत असते. समाजात जात व धर्म यांना चौकटीत बंद करता येणार नाही. परंतू भारूडाच्या माध्यमातून यावर विश्लेषण व मार्मीक टिप्पणी करता येते.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” नियतीचा खेळ खूप गुह्य असतो. समर्पण भावनेने केलेल्या सर्व कार्यांना निश्चितच यश मिळते. त्याग, तपश्चर्या, ध्यास घेऊन लेखिकेने हे कार्य केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले आहे. ऑक्सफर्ड येथे पुढील महिन्यात होणार्या कार्यक्रमात संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांचा संदेश दिला जाणार आहे.”
भारूड साम्रज्ञी पद्मजा कुलकर्णी म्हणाल्या,” वयाच्या १३व्या वर्षापासून मी गाणे लिहित आहे. संसारात राहून भारूड कलेच्या माध्यमातून विभिन्न गोष्टी समाजासमोर मांडल्या. ही लोककला जवळपास संपूर्ण जगभरात पोहचविण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मला आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून घोषित केले.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, ” लोकसंगीतातील भारूड हे केवळ मनोरंजनाचे नाही तर ज्ञान प्रबोधनाचे माध्यम आहे. कलाकरांच्या माध्यमातून ही कला समाजापर्यंत पोहचविली जाते. परंतू पद्मजा कुलकर्णी यांनी भारूड सारखी लोककला परदेशा पर्यंत पोहचविली आहे.”
पं. वसन्तराव गाडगीळ यांनी शुभ आर्शिवाद दिले.
डॉ. महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.