पुणे – कोरेगाव पार्क येथे नियोजित साधू वासवानी पुलाच्या आराखड्यात रहदारी नियोजनाच्या दृष्टीने बदल करावेत, अशी मागणी माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी उपमुख्य मंत्री अजितदादा पवार याच्याकडे काल (रविवारी) निवेदनाद्वारे केली आहे.
कोरेगाव पार्क येथील रेल्वे रूळावरून जाणारा ५० वर्षापूर्वी बांधलेला साधू वासवानी पूल नव्याने बांधण्याचे प्रस्तावित आहे. नवीन पुलाचा प्रस्ताव बनविताना सद्य परिस्थिती आणि भविष्यातील वाहनांची रहदारी याचा विचार कुठेही दिसत नाही. यांकरिता आराखड्यातील बदलासाठी काही पर्याय सुचवित आहे, त्याचा विचार व्हावा, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रस्तावित पुलाची लांबी (६४० मिटर) वाढवून बार्टी कार्यालय ते बर्निंग घाट चौकापर्यंत दुहेरी उड्डाणपूल बनवावा, प्रस्तावित पुलाची लांबी वाढविणे शक्य नसेल तर मंगलदास रोडकडून येणारा चौक आणि कोरेगाव पार्ककडे जाणारा चौक या दोन चौकांना टाळून जाणारा अंडरपास रोड येरवड्याच्या दिशेने बनविण्यात यावा.
मंगलदास रोडकडून येणारा चौक आणि कोरेगाव पार्ककडे जाणारा चौक या दोन चौकात सध्या रहदारीची समस्या उदभवत आहे. ती सोडविण्यासाठी, आगामी काळाचा विचार करून सुचविलेले पर्यायी बदल उपयोगी ठरतील, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.