सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, मगच पुणे लोकसभेसाठी उमेदवाराचा निर्णय घ्या:
पुणे: 40 वर्षे काँग्रेस काम केले,सहा वेळा निवडून आलो,नगरसेवक म्हणुन प्रभावी काम करून दाखविले असे सांगत आबा बागुल यांनी लोकसभेची उमेदवारी देतांना खरा न्याय करा आणि पक्षाविषयी विश्वास प्रस्थापित करून दाखवा असे जाहीर आव्हान कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आबा बागुल यांनी थेट नेत्यांना दिल्याने लोकसभेची उमेदवारी देतांना नेत्यांसाठी बाका प्रसंग निर्माण होऊ शकणार आहे.
कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा सूत्र अमलात आणा
बागुल यांनी या संदर्भात एक पत्र पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पटोले यांना दिले आहे. यात असे म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यास अजून अवधी आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा आहे. आज जरी तो भाजपच्या ताब्यात असला तरी हा मतदारच पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेणे सहजशक्य आहे. त्यासाठी पुणेकरांच्या मनात कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी मी जाहीर सभा घेतो. या सभेला हजारोच्या संखेने पुणेकर नागरिक उपस्थित राहतील. पुणेकर मतदार सुज्ञ आहेत. ते जो कौल देतील, त्यानुसार पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. तुम्ही फक्त या सभेत मार्गदर्शन करा आणि पुणेकरांचा कौल कुणाला आहे हे जाणून घेऊनच लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. मी गेली ४० वर्षाहून अधिक काळ काँग्रेस पक्षाचे कार्य करीत आहे. तब्बल ३० वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय आहे. प्रभागच काय वॉर्ड रचना बदलूनही सलग सहा वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहे. शहर विकासाचे व्हिजन आणि काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे याची मला सदैव जाण असल्यानेच जनतेनेही भरभरून मतदान केलेले आहे. त्यामुळेच सहा टर्म लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांनी स्वीकारले आहे आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ यावर जनमानसातूनच शिक्कामोर्तब झाले आहे. मला समाजकारण -राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. मी खात्रीपूर्वक नमूद करतो की, यंदा पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. त्यासाठी जनमताचाकौल घ्या, जाहीर सभा घेण्यास मला निर्देश द्या, मी सक्षम व तयारीत आहे. तसे झाल्यास पुणेकरांचा कौलही कळेल आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची वातावरण निर्मितीही होईल. कृपया आपण आता गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती. आणि त्यानुसारच ‘कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा’ हे सूत्र लोकसभेसाठी यंदा अवलंबावा ही विनंती. जर तेच ते यशस्वी कलाकार’ ( मोठ्या मताधिक्क्याने पराभूत झालेले) पुन्हा लोकसभेसाठी दिल्यास निकालही नेहमीप्रमाणे यशस्वी’च लागेल. हेच कलाकार आपल्यापुढे वेगळे चित्र निर्माण करतात आणि नंतर जबाबदारीही पेलत नाहीत, घेत नाहीत आणि पराभव झाल्यानंतर मौनव्रतात जातात. परिणामी सर्वांचेच श्रम वाया जातात. गेली अनेक वर्षे शहरात याच मंडळीना जनमताचा कौल मिळाला नाही व मतदारांमध्ये परिवर्तन ही करता आले नाही हेच चित्र आहे. त्यामुळे आता गांभीर्याने विचार करून काँग्रेस पक्ष पर्यायाने राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी, राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे आणि आपण स्वतः यांचे हात बळकट करण्यासाठी ‘कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा’ हे सूत्र यंदा अवलंबून जाहीर सभेतून पुणेकरांकडून मिळणाऱ्या कौल नुसार उमेदवार ठरवावा ही पुनश्च विनंती.