बारामती -येथे असलेल्या विद्या प्रतिष्ठान येथील बारा एकरच्या मैदानावर महारोजगार मेळाव्याचे आयोजन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या निमंत्रीतांच्या यादीमधून राज्यसभेतील खासदार शरद पवार यांना वगळण्यात आले आहे. मात्र, शरद पवार यांनी वेगळीच खेळी करत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अडचणीत आणले आहे. शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामतीमध्ये असलेल्या आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिला आहे.
यासंबंधी शरद पवार यांच्या वतीने मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. बारामती मध्ये कोणताही कार्यक्रम असल्यास शरद पवार हे आलेल्या पाहुण्यांना आपल्या घरी आवर्जून जेवणासाठी बोलवतात. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे. मात्र, आता हे नेते शरद पवार यांचे निमंत्रण स्वीकारतील का? हे पाहावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा बारामती जिल्हा दौरा आहे. त्यातच बारामती मध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शरद पवार यांनी फोन करून देखील आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता अजित पवार हे शरद पवार यांच्या बारामती मधील निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण स्विकारणा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-29-at-16.49.35-712x1024.jpeg)
बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामती शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा महारोजगार मिळावा आणि शरद पवार यांनी दिलेले जेवणाचे निमंत्रण यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.