मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून शोभायात्रा : पादुका पूजन आणि पुष्पवृष्टीने ठिकठिकाणी स्वागत
पुणे : स्वामी भक्तांच्या अलोट गर्दीत पालखीवर पुष्पवृष्टी करत भक्तीमय वातावरणात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत पुणेकरांनी उत्साहात केले. मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून महानगरपालिकेजवळील कॉंग्रेस भवनपर्यंत वाजत-गाजत स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
पालखी सोहळ्याचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलंडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपाली भुजबळ यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती झाली. पालखी सोहळ्याचे यंदा २७ वे वर्ष आहे.
मंडई चौकी – चितळे बंधू मिठाईवाले – नूमवि प्रशाला – अहिल्यादेवी शाळा- रमणबाग शाळा ते शिंदेपार आणि कॉंग्रेस भवन असा पालखीचा मार्ग होता. मिरवणुकीची सुरुवात मंडईतील शारदा-गजानन मंदिरापासून झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारा आणि त्यामागे अश्वराज, राजकुमार, प्रभात, न्यू गंधर्व, स्वरांजली आदी बँडपथके सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेल्या रथातील आकर्षक आरास केलेल्या पालखीचे पुष्पवृष्टी आणि रांगोळ््या घालून पुणेकरांनी ठिकठिकाणी स्वागत केले.
यंदाचा श्री स्वामी समर्थ पुरस्कार यंदा बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दि. 3 मार्च रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार, दिनांक २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता हर्षद कुलकर्णी हे ‘स्वामी भक्ती गीते’ सादर करणार आहेत. तसेच शुक्रवार, दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता श्री साई नवनाथ भजनी मंडळ, गुरुवर्य साईभक्त बाळासाहेब परदेशी ग्रुप भजन आणि साई भक्त गजेंद्र परदेशी व सहकलाकार यांचे सादरीकरण होणार आहे, तर २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मुकुंद बादरायणी हे ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवार दिनांक ३ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामीगीत सुगंध’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती होणार आहे. उत्सवात सर्व दिवस दिवसभर रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.