औंधमध्ये एम्स सुरु करण्यात येणार
अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंक्पात औंध येथे एम्स सुरु करण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. तसेच लातूर, जळगाव, बारामती, नंदुरबार, गोंदिया, कोल्हापूर, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची शासकीय परिचर्या महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबई-महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातल्या सर्व कुटुंबांना मिळणार असून त्यासाठी वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब दीड लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या माध्यमातून राज्यातील नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या माध्यमातून त्यांनी राज्यातील नागरिकांना विमा संरक्षणाचे कवच दिले आहे.
या बरोबरच अजित पवार यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. या योजनेत 8 लाख 50 हजार नवे सौर कृषीपंप बसवणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टी म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य आता 1 हजार रुपयांवरून दीड हजार केले. उसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना सुरू करणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळामार्फत योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक, ठाण्यातील अंबरनाथ येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.