जरांगेंमध्ये धमकी देण्याची हिंमत आली कशी?- शेलार
महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा ही धमकी -यामागे कोण आहे?
मुंबई-अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगे यांच्या मराठा आंदोलनावरून भाजप नेते आशिष शेलार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी झाली. महाराष्ट्र बेचिराख होण्याची भाषा जरांगेंनी केली असून त्यांची SIT चौकशी व्हावी अशी मागणी करत आशिष शेलार आक्रमक झाले तर जरांगे यांना चिथवण्याचा प्रयत्न कोणी केला, त्यांचे आंदोलन कुणी पेटवले असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.जरांगेंच्या वक्तव्यावरून आणि आंदोलनावरून विधानसभेत आक्रमक झालेल्या आमदारांच्या गोंधळामुळे अध्यक्ष नार्वेकर यांनी सभा ५ मिनिटांसाठी तहकूब केली
यावेळी आशिष शेलार म्हणाले, ”मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा केली आहे. ही धमकी आहे का?, यामागे कोण आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. राज्यात कट रचला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची भाषा ही अतिशय चुकीचे आहे. मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही कट रचला जात आहे का? याबद्दल चौकशी झाली आहे”, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
तसेच ”जरांगेंमध्ये धमकी देण्याची हिंमत आली कशी?, संजय राऊत म्हणाले भाजपला संपवून टाकू, आणि दुसऱ्या दिवशी जरांगे यांचे विधान कसे?. मनोज जरांगे कुठे राहतात, त्यांना कोणत्या कारखान्यातून जेसीबी आणि ट्रॅक्टरसह दगडे मिळाली, असा सवाल करताना संपूर्ण नियोजन एका कारखान्यातून आणि घरातून सुरू आहे”, असा गंभीर आरोप शेलारांनी केला आहे.
यावर विजय वडेट्टीवार यांनी देखील हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ”मनोज जरांगे यांनी मला कुत्रा म्हटले पण आम्ही सहन केले. कोण हिरो होण्यासाठी आणि संपूर्ण समाज मागे आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करत होते हे सर्वांना माहिती आहे. जरांगेसोबत सातत्याने चर्चा कोण करत होते. जरांगेंच्या आंदोलनाबद्दल चौकशी करा ही आमचीही मागणी आहे. आंदोलनाला राजकीय स्वरूप कोणी दिले, त्यांना चिथवण्याचा प्रयत्न कोणी केला आणि त्यांचे आंदोलन कुणी पेटवले?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.