२५ फेब्रुवारी रोजी पुण्यात आयोजन
पुणे :
‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स ‘या संस्थेतर्फे ‘महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती ,समस्या आणि उपाय’ या विषयावर राज्यस्तरीय परिषद रविवार, दि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.पाणी वापर आणि सिंचनाशी संबंधित विषयांवर चर्चासत्रे,सादरीकरणे,खुली चर्चा असे या एकदिवसीय परिषदेचे स्वरूप आहे.पाणी वापर आणि सिंचनाशी संबंधित कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, अभ्यासक,अधिकारी सहभागी होणार आहेत.’पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स ‘या संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील,उपाध्यक्ष रवींद्र जायभाये यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
परिषदेत सहभागी होण्यासाठी विनामूल्य पूर्व नोंदणी आवश्यक असून https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeT3qV6Jss4EQGWXOonz0TC0lSFDzBGLFso6npPZ89-DGGghw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&fbclid=IwAR37l-76Sp8k9kbXxMfCRBQ81gY_w4xkW08UJTUTZ5H18wBb9wBr4vNMjng या लिंकवर विनामूल्य नोंदणी करावी किंवा ९८२२८३०७७१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
परिषदेचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता होणार असून सत्रासाठी डॉ. दि. मा. मोरे( निवृत्त सचिव, जलसंपदा विभाग ),एकनाथ डवले(प्रधान सचिव, ग्रामविकास), सुनील चव्हाण( सचिव, जलसंधारण विभाग), प्रकाश मिसाळ( मुख्य अभियंता, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, जलसंपदा विभाग ) ,शशिकांत पाटील(अध्यक्ष, पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स), संग्राम गायकवाड ( आयकर आयुक्त,पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.
‘जलयुक्त शिवार / पाणलोट विकास कार्यक्रम – सद्यस्थिती, उपयुक्तता आणि मर्यादा’ या विषयावर सकाळी 10.35 ते 12.00 या वेळॆत चर्चासत्रात राजेंद्र भोसले(संचालक, मृदसंधारण व पाणलोट विकास व्यवस्थापन, पुणे),डॉ. अविनाश पोळ(मुख्य सल्लागार, पाणी फांऊडेशन, सातारा),सुनील कुशिरे(व्यवस्थापकीय संचालक, जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजीनगर) हे मार्गदर्शन करणार आहेत.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार हे असणार आहेत.
दुपारी 12.10 ते 01.35 या वेळेत ‘नदीजोड / नदी वळण प्रकल्प-गरज, संधी आणि आव्हाने’ या चर्चासत्रात विनय कुलकर्णी(
निवृत्त सचिव, जलसंपदा विभाग), रजनीश शुक्ल(निवृत्त मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग),डॉ. भारत पाटणकर(श्रमिक मुक्ती दल) हे सहभागी होणार आहेत.व्ही.एम.रानडे (निवृत्त सचिव,जलसंपदा विभाग) हे अध्यक्षस्थानी असतील.
दुपारी 02.15 ते 03.40 या वेळेत ‘महाराष्ट्रातील साध्य सिंचन क्षेत्र आणि प्रत्यक्ष भिजणारे क्षेत्र यातील तफावतीची कारणमीमांसा आणि उपाय’ या विषयावरील चर्चासत्रात प्रदीप पुरंदरे(माजी प्राध्यापक, वाल्मी, छत्रपती संभाजीनगर), हनुमंत गुणाले(मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे),डॉ. राजेश पुराणिक(प्राध्यापक, वाल्मी, छत्रपती संभाजीनगर)सहभागी होणार आहेत. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे हे अध्यक्षस्थानी असतील.
दुपारी 03.50 ते 05.25 या वेळेत ‘बिगर शासकीय घटकांद्वारे पाणी व्यवस्थापनः धोरण आणि अंमलबजावणी’ या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात डॉ. एस. ए. कुलकर्णी(निवृत्त सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण), शहाजी सोमवंशी(वाधाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था), रविंद्र उलंगवार(उपाध्यक्ष व प्रमुख -पाणी व्यवस्थापन विलो म्यँथर व प्लॅट पंप्स),प्रांजल दीक्षित(टाटा समाज विज्ञांन संस्था, मुंबई) सहभागी होणार आहेत. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार हे अध्यक्षस्थानी असतील.
संध्याकाळी 05.25 ते 6.20 या वेळेत समारोप सत्र होणार असून त्यात डॉ. संजय बेलसरे(सचिव, जलसंपदा विभाग),सुनील चव्हाण(सचिव, जलसंधारण विभाग ),शशिकांत पाटील(अध्यक्ष, पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स),सनदी अधिकारी समीर उन्हाळे हे सहभागी होणार आहेत.
‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ विषयी
शासकीय धोरणे आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या रचना कशा असाव्यात हे ठरवण्याच्या प्रक्रियांमध्ये शासन, नागरी समुदाय, अभ्यासक तसेच सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. अशा प्रक्रियांमध्ये दर्जेदार आणि क्रियाशील सहभाग नोंदवण्यासाठी ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ या संस्थेची स्थापना झाली.
स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करियर्स (एसआयएसी) या संस्थेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ ही संस्था स्थापन केली आहे. नव्वदच्या दशकामध्ये यूपीएससीच्या सिविल सर्विसेस परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी कुठलीही शासकीय अथवा खाजगी व्यवस्था महाराष्ट्रात नसताना महाराष्ट्र शासनाने एसआयएसी ही संस्था मराठी टक्का वाढवण्यासाठी स्थापन केलेली होती. या संस्थेतून मार्गदर्शन घेतलेल्या बऱ्याच जणांची राज्य किंवा केंद्रीय शासनामध्ये शासकीय सेवांमध्ये निवड झाली तर काही जणांनी बिगर शासकीय क्षेत्रामध्ये करिअर केले. गेल्या काही वर्षांपासून हा गट अनौपचारिक स्वरूपात कार्यरत आहे. एसआयएसीचेच माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक श्री विजय जाधव यांच्या अकाली मृत्यूनंतर ‘विजय जाधव प्रतिष्ठान’ या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्या अंतर्गत सांस्कृतिक आणि स्वयंसेवी स्वरूपाचे विविध उपक्रम या गटाने हाती घेतलेले होते. या उपक्रमांचा पुढचा टप्पा म्हणून ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ या संस्थेची स्थापना झाली आहे. भारतीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी ठोस धोरणे आणि अंमलबजावणीच्या रचना सुचवणारे अनेक उपक्रम संस्थेकडून प्रस्तावित आहेत.