सुनेत्रा पवार यांनी आजपर्यंत काय काम केले हे लोकांना सांगावे…
पुणे- जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचे घर फोडल्याच्या राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या टीकेला स्वतः शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड हे धनंजय मुंडे यांच्या पूर्वीपासून पक्षात काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी काय बोलावे हे कुणीही सांगण्याची गरज नाही. तसे कुणी मार्गदर्शन करण्याचीही गरज नाही, असे पवार यांनी मुंडे यांना फटकारत म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्यावर पवारांचे घर फोडण्याचा आरोप केला होता. जितेंद्र आव्हाड यांनी खऱ्या अर्थाने पवारांचे घर फोडण्याचे आणि शरद व अजित पवारांमध्ये अंतर आणण्याचे काम केले. याचे पुरावे देण्यासाठी माझ्यासह अनेकजण पुढे येतील. आव्हाड हे जयंत पाटील व सुप्रिया सुळे यांना बाजूला सारून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले होते.
धनंजय मुंडे यांच्या या आरोपांना स्वतः शरद पवार यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले. धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीत जेवढा कालखंड गेला, त्याच्या पूर्वीपासून जितेंद्र आव्हाड हे पक्षासाठी काम करत आहेत. आव्हाड यांनी राज्यच नव्हे तर देश पातळीवरही काम केले आहे. ते आमदार व मंत्रीही राहिलेत. त्यांचा अनुभव प्रदिर्घ आहे. त्यामुळे त्यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आव्हाड यांनी वेगळी भूमिका घेतली नाही. त्यामुळे आव्हाड यांनी काय बोलावे याविषयी अन्य लोकांनी मार्गदर्शन करण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना फटकारत म्हटले आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आव्हान देण्याची शक्यता आहे. याविषयी शरद पवार यांना छेडले असता त्यांनी लोकशाहीत सर्वांनाच कुठूनही निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. लोकशाहीत निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कुणी अधिकार गाजवत असेल तर तक्रार करण्याची गरज नाही. आपली भूमिका लोकांपुढे मांडावी. आपण काय काम केले हे लोकांना सांगावे. आम्ही मागील 50 वर्षांत अनेक संस्था उभ्या केल्या. आम्ही ज्या काळात या संस्था स्थापन केल्या त्यावेळी आज आरोप करणाऱ्यांचे वय काय होते, याचे कॅल्क्युलेशन त्यांनी करावे. त्याचा विचार करावा. तुम्ही जरूर उभे राहा. तो तुमचा अधिकारच आहे, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. साधी सरळ गोष्ट आहे. संसदेत भाजपचे बहुमत आहे. त्यांनी विरोधी पक्षाशी चर्चा करावी. सरकारने धनगर, मुस्लिम व लिंगायतांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव आणला तर विरोधक निश्चितच त्यांना सहकार्य करतील. यात कोणताही संशय नाही. असे असताना कोर्टात वेगळी भूमिका मांडणे म्हणजे या घटकांना आरक्षण न देण्याचे धोरण आहे. त्यामुळेच या वर्गावर अन्याय करणारा निकाल आला आहे, असे शरद पवार म्हणाले.