अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित ब्राह्मण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : ब्राह्मण समाजाची वर्षानुवर्षे मूळ भूमिका समाजाचे प्रबोधन करण्याची, दिशा देण्याची आणि नैतिकता जपण्याची राहिली आहे, ती पुढेही सुरू ठेवावी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करून समाजातील नैतिकता टिकायची असेल तर त्याला धर्माचे अधिष्ठान लागते. हे अधिष्ठान ब्राह्मण समाजाकडे असल्याने प्रबोधनाचा अधिकार ब्राह्मण समाजाकडे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा शाखेतर्फे शनिवारी (दि. ९) भव्य ब्राह्मण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण समाजातील चितळे समूहाच्या सुनिता चितळे, धर्मावत ग्रुपचे देवराज धर्मावत, सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, पंचागकर्ते मोहन दाते, पिंताबरी कंपनीचे परीक्षित प्रभुदेसाई या कर्तृत्ववान व्यक्तींचा विशेष पुरस्कार देऊन चंद्रकांत पाटील, नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. त्या वेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. मोहिनी पत्की, राष्ट्रीय सरचिटणीस सत्यजित कुलकर्णी, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जोशी, प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, केतकी कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर तसेच ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी मंचावर होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ब्राह्मण समाजातर्फे अनेक विधी केले जातात परंतु त्याचे अर्थ सगळ्यांच समजतात असे नाही. विधींचे अर्थही समजावून सांगितल्यास समाजप्रबोधन होईल.
महंत सुधीरदास महाराज म्हणाले, समाजामध्ये असंख्य घटना घडत असतात त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम हे पिढ्यान्पिढ्या जो झेलत आला आणि झेलूनसुद्धा टिकला तो ब्राह्मण समाज आहे. धर्म मिटविण्याची कुणाचीही ताकद नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले, देशावर असंख्य आक्रमणे झाली परंतु धर्म टिकविण्यासाठी कुठलीही तडजोड ब्राह्मण समाजाने केली नाही.
सत्काराला उत्तर देताना प्रशांत दामले म्हणाले, जितके कमी बोलशील आणि जास्त ऐकशील तितके शिकशील असे माझ्यावर संस्कार झाले आहेत. हिंदू धर्मात जेवढे श्लोक आहेत त्याला एक सूर, ताल , ठहेराव आहे. प्रत्येक मंत्र म्हटल्यानंतर त्याला ठहेराव आहे. आपला श्वास कसा वापरायचा हे त्या श्लोकामधून समजते. तोच श्वास आपल्याला आचरणात आणायचा असतो.
सुरुवातीस गोविंद कुलकर्णी यांनी महासंघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रास्ताविक मंदार रेडे यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गीतेतील अध्यायावर आधारित ‘संभवामि युगे युगे’ हा नृत्याविष्कार सोनाली करंदीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला.

