पुणे-
“जैन धर्मिय म्हणजे केवळ राजस्थानी गुजराती नव्हे तर जैन धर्म हा संपूर्ण भारतात पसरलेला आहे. विविध प्रांतात जैनांचे उल्लेखनीय काम आहे. जैनांना जो अल्पसंख्यांक दर्जा आहे तो जर काढून घेतला तर जैनांच्या स्वतंत्र अस्तित्वालाच धोका आहे” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद फडे यांनी केले. अरिहंत जागृती मंच यांच्यातर्फे आयोजित निबंध स्पर्धेच्या पारितोषिक प्रदान कार्यक्रम प्रसंगी फडे बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “निबंध लिहिणे ही एक कला असून जो विचार करतो तोच लिहू शकतो. पूजा अर्चा करून चांगले फळ मिळते असे जैन धर्म मानत नाही तर तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे फळ मिळते असा जैन धर्माचा सिद्धांत आहे.”
‘जैन धर्माच्या अस्तित्वाला धोका – कारणे व उपाय’ या विषयावर अरिहंत जागृती मंचातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. प्राप्त झालेल्या १८५ निबंधात स्नेहल छाजेड यांच्या निबंधास प्रथम क्रमांक मिळाला. एकंदर १२ निबंधांना पारितोषिके देण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. कमलकुमार जैन आणि डॉ. श्रद्धा लुणावत यांनी काम पाहिले. मंचाचे अध्यक्ष राजेंद्र सुराणा यांनी प्रास्ताविक केले तर निबंध स्पर्धा समन्वयक श्रीपाल ललवाणी यांनी विषयाचे प्रयोजन सांगितले. विजय पारख यांनी स्पर्धेतील विजेत्यांची नावे घोषित केली तर प्रदीप फिरोदिया यांनी आभार प्रदर्शन केले. अजय ललवाणी यांनी सूत्रसंचालन केले.
जवाहर गुमते, संजय चोरडिया, शांतीलाल नवलाखा, नितीन शहा, संतोष भन्साळी, ईश्वर भुरट, अमित जोगी आदी कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे स्पर्धा यशस्वी झाली. यावेळी अचल जैन, दिलीप मेहता, दिलीप चोरबेले, विठ्ठल साठे, सुरेश लुणावत, दिलीप कांकरिया, गणेश कटारिया, राजश्री मुथा, उषा मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

