पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीतील कामगिरीचे केले स्वागत
वाराणसी:पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज वाराणसीमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी वाराणसीत या विजयाचा जल्लोष साजरा केला.निवडणूक निकालांचे कल स्पष्ट झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांसह एकत्र येत आनंद व्यक्त केला.
आसाममध्ये भाजपने सत्ता राखली असून पुडुचेरीतही भाजप आघाडीने मुसंडी मारली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या जागांमध्ये झालेली मोठी वाढ ही कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.यावेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले की, “आसाम आणि पुडुचेरीमधील जनतेने विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. पश्चिम बंगालमध्येही भाजपने घेतलेली मोठी झेप ऐतिहासिक आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे.
“वाराणसीच्या पवित्र भूमीत पार पडलेल्या या जल्लोषात स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा केला.

