माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नये:नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचे राजकारण्यांना आवाहन; नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
पुणे-नसरापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नसरापूरला धाव घेत आहेत. मात्र, “जोपर्यंत माझ्या चिमुकलीला न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या घरी येऊ नये,” असे कळकळीचे आवाहन पीडितेच्या वडिलांनी केले आहे. देहू येथे लेकीच्या आस्थी विसर्जनासाठी गेले असताना त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे.
१ मे रोजी नसरापूर येथे ६५ वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरू झाले आहे. मात्र, पीडितेचे वडील सध्या विधींसाठी घराबाहेर असताना त्यांच्या घरी नेत्यांची गर्दी होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावर संताप आणि दुःख व्यक्त करत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
नेमके काय म्हणाले पीडितेचे वडील?
“नमस्कार! मी पीडित मुलीचा वडील. आता मी आस्थी विसर्जनासाठी देहू इथे आलो असताना, माझ्या घरच्यांकडून मला फोन आला की, तिथे बरेच राजकारणी लोकं सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे. जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्याने आमच्या घरी भेटायला येऊ नये. एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कुणी लोकं आहेत, त्यांना आम्हाला भेटायचं असेल तेव्हा भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही नराधमाने माझ्या सांत्वनासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे”, असे पीडितेचे वडील म्हणाले आहेत.
नराधमाच्या शिक्षेसाठी नवले पुलावर आंदोलन
दरम्यान, ६५ वर्षांच्या नराधमाने या चार वर्षांच्या बालिकेला ज्या क्रूरतेने संपवले आणि तिचा मृतदेह गोठ्यातील शेणात लपवून ठेवला, त्यावरून जिल्हाभरात जनक्षोभ उसळला आहे. आरोपीला तातडीने फाशी द्यावी किंवा त्याला आमच्या हवाली करावे, या मागणीसाठी नसरापूर ग्रामस्थ आणि पीडितेच्या नातलगांनी शनिवारी नवले पुलावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे ४ तास पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत, आंदोलकांना नवले पुलावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.
मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही लाठीचार्ज झालाच नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “आम्ही पीडितेच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन त्यांची समजूत काढली. काही लोक त्यांना बाहेर पडू देत नव्हते, त्यांना केवळ बाजूला करण्यात आले. आई-वडील स्वखुशीने गाडीत बसले. पोलिसांनी कोणतेही ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ केलेले नाही. पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांना समजावून तेथून बाहेर काढल्यावर पीडित चिमुकलीच्या पार्थिवावर शनिवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

