अॅक्सिस बँकेने आज २०२४च्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीचे आपले निकाल जाहीर केले. बॅंकेने या तिमाहीत ६,०७१ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिसऱ्या तिमाहीत बॅंकेने ५,८५३ कोटींचा नफा कमावला होता. अॅक्सिस बँकेचे निव्वळ व्याजाचे उत्पन्न (एनआयआय) गेल्या वर्षीपेक्षा ९ टक्क्यांनी व गेल्या तिमाहीपेक्षा २ टक्क्यांनी वाढून यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत १२,५३२ कोटी रुपये झाले. २०२३ या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत ते ११,४५९ कोटी रुपये होते. विद्यमान तिमाहीमध्ये बॅंकेचे निव्वळ व्याजाचे मार्जिन (एनआयएम) ४.०१ टक्के होते. ‘क्यूएबी’चा विचार केल्यास, अॅक्सिस बॅंकेकडील ‘कासा’ ठेवींचे प्रमाण मागील वर्षीपेक्षा १३ टक्क्यांनी वाढले, तर मागील तिमाहीच्या तुलनेत १ टक्क्याने वाढले. कासा गुणोत्तर ४२ टक्के इतके आहे. दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या हिशेबानुसार, अॅक्सिस बँकेकडील थकीत कर्जांचे (एनपीए) एकूण प्रमाण १.५८ टक्के इतके भरले, तर निव्वळ प्रमाण ०.३६ टक्के भरले. आर्थिक वर्ष २०२४ मधील तिसऱ्या तिमाहीत बँकेला शुल्कातून मिळणारे उत्पन्न मागील वर्षीपेक्षा २९ टक्क्यांनी व मागील तिमाहीपेक्षा ४ टक्क्यांनी वाढून ५,१७० कोटी रुपये झाले. बॅंकेच्या किरकोळ शुल्कामध्ये गेल्या वर्षीपेक्षा ३६ टक्के व गेल्या तिमाहीपेक्षा ६ टक्के वाढ झाली. बँकेच्या एकूण शुल्क उत्पन्नामध्ये या किरकोळ शुल्काचा वाटा ७२ टक्के आहे. बॅंकेचे एकूण भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (सीएआर) नफ्यासह १६.६३ टक्के झाले. सीईटी-१ गुणोत्तर १३.७१ टक्के इतके आहे.
अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी म्हणाले, “भारताची अर्थव्यवस्था उत्साहवर्धक आहे आणि जागतिक आर्थिक मंचासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरूनही भारताकडे ‘गुंतवणुकीचे महत्त्वाचे ठिकाण’ म्हणून पाहिले जात आहे. २०२४च्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळाली आहे. आम्हाला विश्वास आहे की २०२५च्या आर्थिक वर्षातही हा कल असाच राहील. अॅक्सिस बँकेमध्ये आमचे लक्ष शाश्वत व सर्वसमावेशक वाढीवर केंद्रित आहे. आमच्या प्रत्येक चर्चेत ग्राहकच केंद्रस्थानी असतात. आताच्या तिमाहीत आम्ही ‘स्पर्श सप्ताह’ साजरा केला. त्या सप्ताहात आम्ही ग्राहकाभिमुख स्वरुपाचे शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले. आमच्या पाच हजारांहून अधिक शाखांमध्ये व किरकोळ मालमत्ता केंद्रांमध्ये आम्ही १५ उपक्रम घेतले आणि त्याद्वारे आमच्या ९५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो.”