मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवा केली होती, या दाव्याची ठाकरे गटाने खिल्ली उडवली होती. मात्र आता फडणवीस यांनी कार सेवा करतानाचा फोटो शेअर केला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणही कारसेवक होतो आणि अयोध्येला कारसेवेसाठी गेलो होतो, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो शेअर करत कारसेवेला गेल्याचा पुरावाच दिला आहे.
राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देशभरातून कारसेवकांची लाट उसळली होती. लाखो तरुण त्यावेळी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी त्या दिशेने निघाले होते. त्यावेळची ही आठवण आहे. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती. त्या गर्दीचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहे.
फडणवीसांचे ट्विट काय?
जुनी आठवण… नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे… नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे
एक काळ असा होता प्रभू श्रीरामांचे मंदिर उध्वस्त होऊन बाबरीचा ढाचा तयार झाला होता. अनेक हिंदू राजे, रजवाडे हे मुघलांचे मनसदरबार म्हणून काम करत होते. त्यावेळी आपण गुलामगिरीत गेलो होतो. त्या काळात आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य ही संकल्पना समजावून सांगितली. शिवबा तुला अन्यायाविरोधात उभे रहावे लागेल, रयतेला गुलामगिरीतून सोडवावे लागेल हा मूलमंत्र आई जिजाऊंनी शिवबांना दिला असे देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले. तर बाळासाहेब ठाकरे वाघ होते, त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र बाबरी मशिद पडली तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे कुठे होते? असा खोचक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.